मुलं आणि संस्थेच्या पाठीशी ठाम रहा पल्लवी कोरगांवकर यांचे आवाहन, शांतिनिकेतनमध्ये महिला पालक मेळावा
माधवनगर: शिक्षक विद्यार्थी घडवतो म्हणजे देश उभारणीचं कामच करत असतो. म्हणूनच शिक्षण व्यवस्थेत शिक्षक हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्यावर ही इतकी मोठी जबाबदारी आहे, म्हणूनच त्यांना चुकी करायची मुभा नाही. हूशार मुलांच्या आणि त्यांच्यासाठी सातत्यानं राबणार्या संस्थेच्या पाठीशी उभा रहा. आधुनिक तंत्र आत्मसात करा आणि आपली जबाबदारी यशस्वी करा, असे आवाहन कोरगांवकर ग्रुपच्या सीईओ पल्लवी कोरगांवकर यांनी केले.
प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील सोशल फोरम आणि नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांया संयुक्त विद्यमाने शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगलीच्या संस्थापक संचालिका कै. प्राचार्या सौ. सरोजमाई पाटील यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमीत्त आयोजित महिला पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नवभारत शिक्षण मंडळाच्या विश्वस्त श्रीमती विनया घोरपडे होत्या. यानिमीत्त संस्थेचे माजी शिक्षक प्रल्हाद शिंदे आणि मौला येलुरकर यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, पुरस्काराची रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोरगांवकर यांनी सेवानिवृत्तीनंतरही शांतिनिकेतनने जपलेल्या या आपुलकीचे कौतूक केले.
श्रीमती घोरपडे यांनी सरोजमाईंच्या शिस्त आणि शाबासकीच्या आठवणी सांगत घर आणि संस्था दोन्हीही कामात माईंचे योगदान खुप मोठे होते असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील यांनी केले. प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या नवनिर्मीतीच्या प्रत्येक प्रयोगामध्ये माईंचे योगदान खुप मोठे होते. संस्था उभारण्यापासून हजारो विद्यार्थी घडवण्यासाठी माईंनी आईसारखे काम केले. चाणाक्ष आणि मनमिळावू असलेल्या माईंच्या विचारांनीच संस्था विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रीमती पुष्पलता पाटील, डॉ. नंदिनी पाटील यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. रिध्दी भागवत हिने मानपत्र वाचन केले. माधुरी आवटे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार उपसंचालक डी.एस.माने यांनी मानले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक गौतम पाटील, फोरमचे सचिव बी.आर.थोरात, सनतकुमार आरवाडे, डॉ. मोहन पाटील, प्रशासकीय अधिकारी एम.के.आंबोळे यांच्यासह संस्था आणि फोरमचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला पालक उपस्थित होते.
शांतिनिकेतनमुळं आयुष्य उभं राहिलं:
शांतिनिकेतन हेच आमचं कुटूंब होतं. अतिशय गरीब घरातून आम्ही आलो. सुकडी आणि माईंनी प्रेमानं वाढलेली भाकर खाऊन शिकलो. इथंच कामाला लागलो. पडीक जमीन चांगली करुन 8 एकरवर झाडं लावली. कलापथकाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शिक्षणाचा प्रचार केला. तेव्हा शांतिनिकेतन होतं म्हणूनच आमच्यासारख्या हजारो मुलांचं आयुष्य उभं राहिलं, अशी भावना प्रल्हाद शिंदे, मौला येलुरकर यांनी व्यक्त केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.