चला आता मुंबई विकून टाकू या......!
गेल्याच आठवड्यात "मुंबई, महाराष्ट्र आणि भाजपचे षडयंत्र" या लेखामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे भाजपचे कशाप्रकारे षडयंत्र सुरु आहे यावर मी प्रकाशझोत टाकला होता. आणि मुंबई, महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय केले पाहिजे हे ही सुचविले होते. स्वतःचा पक्ष वाढविण्यासाठी राजकारण करणे, राजकारण खेळणे हा भाग वेगळा आहे. पण, दिल्लीश्वरांची मर्जी राखण्यासाठी स्वतःच्या मातृभूमीशी गद्दारी करणे म्हणजे आईचे काळीज काढून विकण्यासारखेच होय. आणि हे महापाप भाजपकडून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. आणि त्या पापाचे वाटेकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नियती कोणालाच माफ करीत नाही. तसेच या पापाचे प्रायश्चित या दोघांना मिळणारच आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांचा वापर करीत आहे हे सामान्य माणसाला कळते मग शिंदेंना कळत नसेल का?
ही सर्व आगपाखड करण्याचे कारण हेच आहे की, महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांसाठी नोकरीची उत्तम संधी असलेला आणि महाराष्ट्राच्या महसूलात करोडो रूपयांची भर टाकणारा १.५८ लाख कोटींचा "फाॅक्सकाॅन प्रकल्प" कालच गुजरातला शिफ्ट झाला आहे. आघाडी सरकारने आणलेला हा प्रकल्प जून महिन्यापर्यंत महाराष्ट्रातच उभारण्याचे ठरले असताना अचानक गुजरातमध्ये गेलाच कसा? मग, हे ED चे सरकार काय झोपा काढत होते का? का, पन्नास खोके एकदम ओके मोजत बसले होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखे एकत्र गणपती दर्शनापासून यांना सवड मिळेल तेंव्हा ना? महाराष्ट्रातील तरूणांना वेडे करण्यासाठी दहीहंडीचा साहसी खेळात समावेश करून त्यांना नोकरीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. धार्मिक सणाच्या नावाखाली तरूणांना वेडे करुन नोकरीपासून वंचित ठेऊन त्यांच्या बेकारीचा फायदा घेऊन त्यांना आपले गुलाम बनविण्याचा मनसुबा या ED सरकारचा आहे.
महाराष्टापासून मुंबई केंद्रशासित करणे आणि विदर्भ वेगळे राज्य करणे हा तर देवेंद्र फडणवीसांचा छुपा अजेंडा आहे. फडणवीसांचे सरकार असताना कित्येक प्रकल्प, उद्योग आणि सरकारी कार्यालये गुजरातला हलविली गेली आहेत. सरकारवरुन पायउतार होणार हे लक्षात आल्यानंतर याच फडणवीसांनी महाराष्ट्राचे ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत पाठविले होते. केंद्राची मर्जी राखण्यासाठी बिन कामाचा आणि राज्याला खर्चात करणारा बुलेट ट्रेन प्रकल्प आपल्या माथी मारून घेण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका आहे. भाजप आणि फडणवीस इतके खुलेआम महाराष्ट्राला धोका देत असताना मिडिया मुग गिळून गप्प बसली आहे. एकालाही असे वाटत नाही कि, आपण असे प्रश्न विचारावे. पक्षाच्या प्रवक्तांच्या प्रतिक्रिया घेण्याचे सोडून तो तोतल्या, राणे आणि इतर बिनकामाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन दिवसभर टीव्हीवर त्याच त्याच बातम्या रवंथ करत ब्रेकींग न्युजच्या नावाखाली दाखविणे हे कोणत्या पत्रकारितेत बसते? प्रसारमाध्यमांनी हि "पित पत्रकारिता" बंद करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे साबित करण्याची वेळ आता आली आहे.
महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही जाती, धर्माची, पंथाची असो अथवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो, विशेष करुन भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो त्याने महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्या या राजकीय प्रवृत्तींना विरोध केलाच पाहिजे. आज आपण गप्प बसलो तर भविष्यात येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. चुकीच्या गोष्टींना विरोध हा केलाच पाहिजे. धर्म आणि राज्य या दोन भिन्न गोष्टी आहेत. याची सांगड घालून राजकारणी आपली दिशाभूल करीत आहेत. धर्माच्या नावावर कोणतेही राष्ट्र प्रगती करु शकत नाही. धर्माचे राज्य हे धोकादायक असते. त्यासाठी विज्ञानाची कास ही धरावीच लागते. म्हणून धर्म एका बाजुला आणि राष्ट्र एका बाजूला हा दृष्टिकोन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हल्ली महाराष्ट्रात जे चालले आहे ते अतिशय वाईट आहे. आज फाॅक्सकाॅन सारखे प्रकल्प गुजरातमध्ये गेले, याआधीही अनेक सरकारी कार्यालये गुजरातला हलविली. हा धोका आपण वेळीच ओळखला नाही तर ही लोकं मुंबई कधी विकतील याचा थांगपत्ताच लागणार नाही. म्हणून छत्रपतींच्या मावळ्यांनो सावधान... गनीम दारात येऊन उभा राहीला आहे. आता तुम्हाला तलवार हातात घ्यावीच लागेल. नाहीतरी तुम्हाला अदानी अंबानीचे गुलाम व्हायला वेळ लागणार नाही ...!
तुर्तास इतकेच...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.