फडणवीस पवारांच्या मदतीला धावले
मुंबई, 9 एप्रिल : अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेस नेत्यांकडून शरद पवारांना लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी याच मुद्द्यावरून शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अलका लांबा यांनी ट्विट करत पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मात्र अलका लांबा यांच्या या ट्विटचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हटलं लांबा यांनी?
अलका लांबा यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाण साधला आहे. काही भीत असलेले स्वार्थी लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हुकमशाहाचे गुण गात आहेत. देशातील लोकांची लढाई एकटे राहुल गांधी लढत आहेत. असं लांबा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
फडणवीसांकडून टीकेचा समाचार दरम्यान भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलका लांबा यांच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ता येईल, जाईल पण काँग्रेसच्या एका नेत्याने गेले 35 वर्ष त्यांच्यासोबत असलेल्या आणि चारावेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या एका ज्येष्ठ नेत्यावर अशा पद्धतीनं टीका करावी हे भयावह असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे राजकीय संस्कृती बिघडवत असल्याचा टोलाही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये लगावला आहे.
नेमकं काय म्हटलं होतं पवारांनी?
अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. जेपीसीमध्ये देखील सत्ताधारी पक्षाचे अधिक सदस्य असणार त्यामुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आता यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
