दहावी-बारावीच्या निकालाच्या ठरल्या तारखा! उत्तरपत्रिकांची तपासणी
पूर्ण; बारावीचा निकाल १३ मे तर दहावीचा निकाल 'या' दिवशी; घरबसल्या पहाता
येईल निकाल
सोलापूर : राज्यातील सर्वच शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्या आहेत. आता निकाल छपाई सुरू झाली असून १३ मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५
किंवा १६ मे रोजी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
दिली. त्याची अधिकृत घोषणा शिक्षणमंत्री करतील, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी
सांगितले.
यंदा पहिल्यांदाच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च य काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात बोर्डाने घेतली. परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे.
चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचा निकाल ११ मेपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर १३ किंवा १४ मे रोजी बारावीचा तर दहावीचा निकाल १६ मेपूर्वी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्यासंदर्भातील वेबसाइट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहेत. निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
शिक्षणमंत्री करतील लवकरच घोषणा
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या गुणांची अंतिम पडताळणी सुरू आहे. आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. निकालाच्या तारखा पुढील आठवड्यात शासन स्तरावरून जाहीर होतील.
- औदुंबर उकिरडे, अध्यक्ष, पुणे विभागीय मंडळ
दहावी-बारावीचे परीक्षार्थी
बारावीचे विद्यार्थी
१५.२४ लाख
दहावीचे विद्यार्थी
१६.३९ लाख
एकूण विद्यार्थी
३१.६३ लाख
दोन्ही इयत्तांचे निकाल
१३ ते १६ मेपूर्वी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.