परभणी : पुण्यातील वैष्णवीचं प्रकरण ताजे असतानाच परभणीतही एका २१ वर्षीय विवाहितेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. परभणीच्या झरीतील घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या
तक्रारीवरून परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात साक्षीच्या पती, सासू सासरे
यांच्यासह एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वांना
अटक करण्यात आली आहे. शिवाय या ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात
आली आहे.
परभणीच्या झरी गावातील साक्षी हिचा विवाह १२ डिसेंबर २०२२ रोजी गावातीलच एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या चंद्रप्रकाश लाटे यांच्याबरोबर झाला होता. लग्न झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनंतर साक्षीला तिच्या सासू प्रमिला लाटे, सासरे भिकुदास लाटे यांनी मानसिक त्रास द्यायला सुरू केला. 'तुला स्वयपाक चांगला येत नाही, कोणतेही काम तू नीट करत नाही', असं म्हणून सारखे छोट्या मोठ्या गोष्टींवरुन त्रास देणं सुरू केलं. तसेच नवरा चंद्रप्रकाश हाही दारु पिऊन आई वडिलांचं ऐकून साक्षीला त्रास देत होता. तसेच मारहाण करत होता. शिवाय तिच्या आई वडिलांना फोनवर बोलूही देत नव्हता. यामुळं कंटाळून लग्नाच्या महिनाभरातच साक्षी ही माहेरी आली त्यांनतर साक्षीने पती पत्नीत समेट घडावी यासाठी भरोसा सेलकडे अर्ज दिला होता. मात्र, त्याच्याशी उलटच परिणाम झाला. तिला पुन्हा 'तू पोलिसांकडे का गेली?' असं म्हणत जास्त त्रास देणं सुरू झालं. महत्वाचं म्हणजे 'मी एमपीएससी करतो, मला नोकरी लागणार आहे. मी तुला घेऊन जाणार आहे', असं म्हणत तिचा मानसिक छळ करत होता.दरम्यान, साक्षीच्या वडिलांनी साक्षीला नांदायला घेऊन जावं यासाठी गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेतही त्यांच्या कुटुंबीयांची समेट घडवण्यासाठी भेट घेतली होती. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. या बैठकीनंतरही तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ केली. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साक्षीचे तिच्या पतीबरोबर फोनवर बोलणं झाले आणि तिनं घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन साडीनं गळफास घेवून आत्महत्या केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.