HbA1C मधुमेहावरील नियंत्रण
‘तुमचे HbA1C किती आहे?’ असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी किंवा आप्तेष्टांनी (खास करून परदेशी राहणाऱ्यांनी) विचारला असेल.हे ऐकल्यावर ‘आता ही काय नवीन भानगड?’ असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल.हल्ली कोणत्याही तज्ज्ञ / स्पेशालिस्टडॉक्टरांकडे उपचारांसाठी गेले असता HbA1C ही टेस्ट करून घ्यावी लागते.याचे कारणही तसेच आहे.मधुमेहावर आपले किती नियंत्रण आहे, हे दर्शविणारी ही सर्वोत्तम चाचणी आहे.रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान आणि उपचारांची दिशा ठरविण्यासाठी ह्या चाचणीचा अहवाल डॉक्टरांसाठी महत्त्वाचा असतो.
HbA1C टेस्ट म्हणजे नेमके काय?
ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन HbA1C ही एक प्रकारची रक्ततपासणी आहे.दिवसातील कोणत्याही वेळी ती करता येते.सर्वसाधारण व्यक्तींमध्ये HbA1C चे प्रमाण ४ ते ५.७ टक्के असते.ज्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण ५.७ ते ६.४ टक्क्यांच्या दरम्यान असते,अशा व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते किंवा तुम्हाला मधुमेह असल्यास हे प्रमाण मधुमेहावर तुमचे योग्य नियंत्रण असल्याचे दर्शविते.तर ६.५ टक्क्यांहून अधिक HbA1C प्रमाण असल्यास तुम्हाला मधुमेह असून रक्तातील साखरेवर तुमचे नियंत्रण नसून यामुळे मधुमेहजन्य व्याधी होण्याची शक्यता बळावते.या चाचणीमुळे मागील दोन-तीन महिन्यांमधील रक्तातील साखरेवरचा सरासरी ताबा निदर्शनास येतो.नेहमीच्या रक्तातील साखर तपासणीबरोबरच दर तीन ते सहा महिन्यांनी ही चाचणी केल्यास मधुमेहावरील नियंत्रणाबद्दल डॉक्टरांना सखोल कल्पना येते व पर्यायाने औषधयोजनेत आवश्यक ते बदल करणे शक्य होते.
इतर रक्त तपासण्यांपेक्षा ही टेस्ट वेगळी कशी?
मधुमेहाचे निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या रक्तातील साखर तपासणी परीक्षांमधील उणिवा HbA1C चाचणीने भरून काढता येतात.उदा.काही मधुमेही व्यक्ती रोजच्या जीवनात आहार नियंत्रण, व्यायाम व औषधोपचार यात कोणत्याही प्रकारची शिस्त पाळत नाहीत.परंतु रक्तचाचणीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागतो, तसे थोडेफार पथ्यपालन करू लागतात.(काही वेळा जाणूनबुजून, तर काही वेळा अजाणतेपणाने.) अशा व्यक्तींचा रक्तातील साखर तपासणीचा निकाल उत्तम असतो,परंतु तो फसवा असतो.कारण रक्तातील साखरेवर त्यांचे फक्त काही दिवसांपुरते उत्तम नियंत्रण असते आणि नेमक्या त्याच दिवसांत ही रक्ततपासणी केली जाते.अशा व्यक्तींची HbA1C तपासणी केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते.ह्या उलट सदासर्वदा शिस्तीत राहणाऱ्या मधुमेही व्यक्तीकडून एखाद्या वेळी अपवादात्मक शिस्तभंग (मधुमेहावरील व्यायाम, आहार आणि औषधोपचाराच्या दृष्टिकोनातून) होऊ शकतो.नेमका तोच दिवस रक्तचाचणी करण्याचा असल्यास रुग्णाच्या रक्तातील साखर वाढलेली असते.अशा वेळी HbA1C चाचणी केल्यास त्याचा अहवाल चांगला असतो व विनाकारण औषधांची मात्रा वाढविल्यामुळे होऊ शकणाऱ्या भावी त्रासांपासून मधुमेही व्यक्ती चार हात लांब राहू शकते.त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी HbA1C ही चाचणी करणे मधुमेही व्यक्तीसाठी उपयुक्त ठरते.
HbA1C चे प्रमाण
प्रत्येक मधुमेही व्यक्तीने आपल्या डॉक्टरांच्या / मधुमेहतज्ज्ञाच्यासल्ल्यानेआपलेवैयक्तिकलक्ष्यनिश्चितकरावे.उदाहरणार्थ, गरोदर महिलांमध्ये HbA1C प्रमाण ६ टक्के, तरुण मधुमेही व्यक्तींमध्ये हेच प्रमाण ६-६.५ टक्क्यांदरम्यान, मध्यमवयीन व्यक्तींमध्ये ६.५ ते ७ टक्के, उतारवयात ७-८ टक्के (गंभीर हृदयविकार,गंभीर मूत्रपिंड विकार, पक्षाघात, शरीरात पसरलेला कर्करोग इत्यादी असल्यास ७.५ ते ८ टक्क्यांच्या मध्ये) असायला हवे. दर तीन ते सहा महिन्यांनी HbA1C तपासणी करून, रिपोर्टची फाईल बनवून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही.जर HbA1C म्हणजेच तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असल्यास आपल्या डॉक्टरांबरोबर चर्चा करून यामागची कारणे शोधून ती दूर करणे अत्यावश्यक आहे.उदाहरणार्थ, सकाळी उपाशीपोटी आणि दुपारी जेवणानंतर दोन तासांनी तपासणी केलेली साखर काबूत आहे किंवा फारशी जास्त नाही परंतु HbA1C चे प्रमाण ८.५ टक्के आहे.अशा वेळी गेल्या दोन महिन्यांत आपण काही दिवस औषधे बंद केली होती का?व्यायाम तसेच आणि आहार नियंत्रणाला रजा दिली होती का?
( पाऊस, लॉकडाऊन, एकामागून एक जवळच्या नात्यातील लग्ने अशी वेगवेगळी कारणे तुमच्याकडे असू शकतात.) सकाळी माफक आणि रात्री ताव मारून जेवणाऱ्यांपैकी आपण आहात का?यासाठी अधूनमधून रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी ग्लुकोमीटरवर रक्तातील साखर तपासून ह्याचा पडताळा करणे श्रेयस्कर.जी काही चूक सापडेल ती तातडीने दुरुस्त करायला हवी.तुम्हाला मधुमेहजन्य रोगांपासून दूर राहायचे असेल, चांगल्या प्रतीचे व शेवटपर्यंत स्वावलंबी आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला HbA1C लक्ष्य सतत साध्य करत राहिले पाहिजे.निव्वळ रक्तातील साखरेच्या पातळीवर सतत अवलंबून राहणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते.त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिला असल्यास HbA1C टेस्ट करून घ्या, त्यात हयगय करू नका.ते तुमच्याच फायद्याचे आहे.यामुळे मधुमेह तसेच मधुमेहजन्य आजारांवर वेळेत मात करणे शक्य होऊ शकते.
वेळ द्या स्वत:ला, व्यायामाला
पैसा नौकरी सगळ आहे योग्य....
पण त्याचाही उपभोग घ्यायला, हवं निरोगी आरोग्य..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.