अहिल्यांगर: कुणबी जात प्रमाणपत्राचे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वीस हजार रुपयाचे लाच मागून तडजोडीत १८ हजार रुपये स्विकारणाऱ्या महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पकडले आहे. कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे पडताळणी करण्यासाठी सर्रास पैसे मागितल्याचा आरोप होत होता, शेतकरी, सामान्य लोकांची होणारी लुट या प्रकारामुळे उघड झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू झालेल्या आंदोलनानंतर दोन वर्षात अनेकांच्या कुणबी नोंदी सापडल्या. त्यानंतर प्रमाणपत्रे काढून घेतली. मात्र पात्र प्रस्ताव असूनही जात पडताळणी करत नाहीत, त्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्या आरोपाला आता पुष्टी मिळाली आहे.एका तक्रारदाराने आपल्या १९ वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जून महिन्यात जिल्हा समितीकडे अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र मिळत नसल्याने तो चिंतेत होता. ऑनलाइन अर्जाची चौकशी करताना एका सायबर कॅफेतील कर्मचाऱ्याने त्याला आरोपी महिलेचा संपर्क दिला. तिने प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला २० हजार रुपयांची मागणी केली, जी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगितले.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाचलुचपत विभागाच्या पथकाने व्हॉइस रेकॉर्डरचा वापर करून पडताळणी केली. नोबेल हॉस्पिटल, रॉयल हॉटेल आणि इतर ठिकाणी झालेल्या चर्चेत महिलेची लाच मागणी केल्याचे स्पष्ट झाली. तिने अखेर १८ हजार रुपयांवर तडजोड केली. लाचलुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदाराने ९,५०० रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ८,५०० रुपयांच्या बनावट नोटांवर पावडर लावली.
जुना पिंपळगाव रोडवर महिलेच्या हातात १८ हजार रुपये दिले. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सदर महिलेला ताब्यात घेतले.आरोपी महिलेचे नाव उषा मंगेश भिंगारदिवे (वय ३३, रा. प्लॉट नं. १०३, श्रीनाथ कॉम्प्लेस, भिस्तबाग चौक) असून, ती खासगी महिला आहे. तिने ही रक्कम जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व इतर १०-१५ जणांसाठी पैसे घेतल्याचे कबूल केल्याचे सांगितले आहे. आता ज्यांच्यासाठी पैसे घेतले त्यांच्यावर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे अशीच लुट सुरू राहणार आता प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दलालांचा सुळसुळाट
अहिल्यानगर येथील जात पडताळणी समिती कार्यालयात दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. येथे कामासाठी व्यक्ती आली की दलाल जाळ्यात ओढून पैशाची मागणी करतात. येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याने दलालांना कोणी अटकाव करत नाही. सर्व सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची मात्र सर्रास लुट होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.