ऑस्ट्रेलियन महिला संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघासमोर ४१३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ४७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या मॅचसह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका १-२ अशी गमावली. पण पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात गमावल्यावरही भारतीय महिला संघाने ४७ षटकात ३६९ धावा करत इतिहास रचला. मोठ्य़ा धावसंख्याचा पाठलाग करताना आतापर्यंत कोणत्याही संघाला एवढ्या धावा करता आलेल्या नाहीत.
४०० धावा करूनही ऑस्ट्रेलियाला भरली होती धडकी
भारताकडून सलामीची बॅटर स्मृती मानधना सर्वात पुढे होती. तिने शतकी खेळीसह विक्रमांची 'बरसात' केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार हरमनप्रीत कौरनंही अर्धशतकी खेळीसह तिला उत्तम साथ दिली. कर्णधार अन् उप कर्णधार जोडी जमल्यावर ४०० पेक्षा अधिक धावा करून सर्वाधिक वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला धडकी भरली होती. स्मृती मानधनाने जलद अर्धशतक झळकावल्यावर त्याच तोऱ्यात शतकही साजरे केले. विराट कोहलीला मागे टाकत ती भारताकडून महिला अन् पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने शतक साजरी करणारी बॅटर ठरली. महिला वनडेत सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक शतकांचा विक्रमही तिने सेट केला. २०२४ प्रमाणे हे वर्ष आणि आगामी वर्ल्ड कप स्पर्धा गाजवण्याच संकेत तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या शतकासह दिले.
हरमप्रीतनं इंज्युरी ब्रेक घेतला अन् तिथं सामना फिरला, ते कसं?
ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८५ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर स्मृती आणि हरमनप्रीत जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची दमादर भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचेल, याचे संकेत मिळाले होते. २० षटकात भारतीय संघाने २ विकट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २०४ धावा लावल्या होत्या. स्मृती मानधनाने विक्रमी शतक झळकावले होते. दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौरनं आपल्या वनडे कारकिर्दीतल सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. २१ व्या षटकात भारताची कर्णधार स्नायू दुखापतीमुळे त्रस्त दिसली. तिच्या पायात क्रँम्प आल्यामुळे तिने एक इंज्युरी ब्रेक घेतला. अन् सेट झालेली जोडी फुटली. हरमनप्रीत कौर या इंज्युरी ब्रेकनंतर पुढच्या चेंडूवर आपली विकेट गमावली. तिने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तिच्या पाठोपाठ स्मृती मानधनाच्या खेळीलाही ब्रेक लागला. तिने ६३ चेंडूत १२५ धावांची खेळी केली. भारतीय संघाने बॅक टू बॅक ओव्हरमध्ये या विकेट गमावल्या. जर या दोघींपैकी एक आणखी चार पाच षटके खेळली असती तर टीम इंडियाने ४१२ धावांयाही यशस्वी पाठलाग केल्याचे पाहायला मिळाले असते.
दीप्तीसह स्नेह राणाची क्लास इनिंग
हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना माघारी फिरल्यावर रिचा घोष आणि राधा यादव स्वस्तात माघारी फिरल्या. पण तरीही भारतीय संघाने हिंमत हारली नाही. दीप्ती शर्मानं दमदार अर्धशतक झळकावले. तिने ५८ चेंडूत ७२ धावांची खेळी करत आठव्या विकेटासठी स्नेह राणाच्या साथीनं ६५ धावांची भागीदारी रचली. स्नेह राणानं ४१ चेंडूत ३५ धावा केल्या. या दोघींच्या विकेटसह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.