"मोदी खुर्ची खाली करा, दोन रील्स बाहेर काढतोय!" मुंबईतून आंबेडकरांचा इशारा; 'एपस्टीन फाइल'वर राजकारण पेटलं
एपस्टीन फाइल्स आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या कथित 'एकतर्फी' व्यापार धोरणावरून देशासह आतंरराष्ट्रीय पातळीवर राजकीय वातावरण तापलं आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत महाआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना थेट इशारा दिला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा.
तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर, नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी. भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी भाजपला नरेंद्र मोदी यांना पायउतार करावे लागेल," असा घणाघात आंबेडकर यांनी केला. मुंबईतील महाआंदोलनात कार्यकर्त्यांनी "मोदी हटाव, देश बचाव", अशी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसह मातंग मुक्ती सेना आणि इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर, नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करा. तर रील्स थांबवतो. आमच्या पुढे दोनच मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा, ते जर करायचे असेल तर, तुम्हाला संपवा. तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर, तुम्ही खुर्ची खाली करा. आम्ही सगळं बघून घेऊ." आम्ही भाजपचा राजीनामा मागत नाही. सत्ता तुमचीच राहणार आहे. लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडणूक दिंल आहे. तुम्ही काय निवडणूक घेणार नाही. सत्ता तुमचा राहाताना, भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी भाजपला नरेंद्र मोदी यांचा बळी द्यावाच लागेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
महाआंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कथितरित्या एपस्टीन फाइल्समध्ये आल्याचा दावा करत पारदर्शक चौकशीची मागणी केली. अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, आरएसएस-इस्रायल संबंध, परराष्ट्र धोरण आणि अमेरिकेसोबतचे करार यावर टीका केली. "भारत पुन्हा गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार करार हा देशाच्या हिताविरोधात आहे," असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच एपस्टीन प्रकरणाबाबत पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आखाती देशांमध्ये कार्यरत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली. सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक भारतीय आखाती देशांत कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय तणाव वाढल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या देशासमोर नाचतो, त्याचा प्रश्न इथला मीडियाचा मालक विचारत नाही. त्यांना आमचा सवाल आहे, लोकांचा रोष शिगेला पोहोचताना दिसतोय. त्याला तुम्ही दाखवणार आहेत की नाही? असा सवाल आंबेडकर यांनी केला. देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
या आंदोलनादरम्यान सीएसएमटी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईसह उपनगरांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रुपवते, दिशा पिंकी शेख, सुजात आंबेडकर, चेतन अहिरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.