सुप्रीम कोर्टात जा, आम्हाला फरक पडत नाही! 'नीट'मुळे मोदी सरकार पुन्हा संकटात? 6 विद्यार्थी आणणार जेरीस...
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत आलेल्या केंद्र सरकारसमोरील संकट थांबण्याचे नाव घेत नाही. आता याच परीक्षेशी संबंधित एका मुद्द्यावरून सहा विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर त्यांची याचिका सुनावणीला आली होती.
नीट यूजी २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. परीक्षेदरम्यान दिलेली उत्तरांची OMR शीट आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून देण्यात आलेल्या OMR शीटमधील उत्तरांमध्ये तफावत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना या ओएमआर शीट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 'लाईव्ह लॉ'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टातील याचिकेमध्ये म्हटले आहे की, सहा विद्यार्थ्यांना परीक्षेत दिलेल्या उत्तरांच्या आधारे ६०० ते ६५० हून अधिक गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र, एनटीएने दिलेल्या ओएमआरमधील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा सहा विद्यार्थ्यांच्या वकिलांनी केला आहे. एनटीएकडून विद्यार्थ्यांना तक्रारी व हरकतींसाठी मुभा दिली होती. पण निकालानंतर ही तफावत आढळून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला फरक पडत नाही
याचिकाकर्ते विद्यार्थी एनटीएकडे गेले होते का, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केल्यानंतर वकिलांनी सांगितले की, एनटीएकडून ई-मेलला काहीही उत्तर आले नाही. विद्यार्थी प्रत्यक्ष भेटलेही होते. पण तिथल्या अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात जा, आम्हाला काही फरक पडत नाही, असे उत्तर दिल्याचा दावा वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला.
खंडपीठातील दुसरे न्यायाधीश जॉयमाला बागची यांनी विद्यार्थ्यांनी हरकती नोंदविल्या होत्या का, असा सवाल केला. एनटीएकडून हरकतींसाठी वेळ देण्यात आल्याच्या कालावधीत ओएमआर शीट अपलोड करण्यात आली होती. ही एनटीएची चूक होती, असे वकिलांनी सांगितले.
त्यानंतर सरन्यायाधीशांनी या याचिकेवर नियमित सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटमधील उत्तरे आणि प्रत्यक्ष परीक्षेत दिलेल्या उत्तरांमध्ये तफावत असल्याची नाराजी व्यक्त केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.