शाळा बंद करण्याच्या अधिकारासंदर्भात शिक्षणमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाल्या.
मुंबई : राज्यभरातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता करोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
तसेच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जाते आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच स्थानिक पातळीवर शाळा सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, आम्ही जेव्हा नियमावली बनवली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून नियम बनवले. आम्ही टास्क फोर्ससोबत सातत्याने बोलत आहोत. ही नियमावली टास्क फोर्सला देखील पाठवली. त्यावर चर्चा झाली आणि मग ही नियमावली (एसओपी) निश्चित झाली. याशिवाय काही निर्णय घ्यायचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असो की इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्यानुसारच भविष्यात निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी शाळा बंद करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले. शाळा सुरू करायची की नाही याचाही निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे मुंबई, पुणे या शहरांच्या शाळेत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार होत आहे. हे सर्व लक्षात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. तसेच आपण सर्वांनी काळजी घेत सावधानतेने वागले पाहिजे. करोनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.