भिवघाटजवळ तासगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघेजण ठार
खानापूर (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ तासगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने केबल वाहिनीच्या कामावरील दोघे कामगार ठार झाले. नागेश लक्ष्मण जाधव (वय ३८, रा. रामपूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर) व अनिल रामू चव्हाण (१८, रा. केरुरगी, ता. सिंदगी, जि. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत.
मुकादम जयसिंग धनसिंग राठोड यांनी अपघाताची फिर्याद दिली. अपघातग्रस्त कामगार 'बीएसएनएल'च्या केबल वाहिनीचे काम करण्यासाठी करंजे येथे आले होते. भिवघाट ते करंजे रस्त्याच्या कडेला भिवघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीशेजारी हे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता काम संपवून अपघातग्रस्त कामगार रस्त्याच्या बाजूला बोलत उभे होते.यावेळी तासगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने नागेश जाधव व अनिल चव्हाणला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण चिरडले गेले. दोघांच्या डोक्यास गंभीर मार लागला. नागेश जाधव जागीच ठार झाला, तर अनिल चव्हाणला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
अज्ञात वाहन अपघातस्थळी न थांबता वेगात निघून गेले. यावेळी तेथे उपस्थित असेलेले जयसिंग राठोड ओरडल्यामुळे घटनास्थळी कंपनीचे अभियंते व काही लोक आले. त्यांनी अज्ञात वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन सापडले नाही. अपघाताची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. डी. नागराळे, संतोष घाडगे, लक्ष्मण गुरव पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.