सांगलीत आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दोन तास लेखणी बंद
सांगली : परिवहन विभागातील (आरटीओ) बढतीसाठी आकृतीबंध कार्यान्वित होऊनही अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. अहवालाची अंमलबजावणी त्वरीत करावी, ही मागणी प्रलंबित असल्याने बढत्या पदोन्नती रखडल्या आहेत. यामुळे संतप्त मोटार वाहन विभागाच्या कर्मचारी संघटनांनी आज सोमवारी दोन तास लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे सांगलीतील आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.
सरकारी धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आकृतीबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनाला २०१६ मध्ये सादर केला होता. आकृतीबंध मंजूरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे प्रखर लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२३ रोजी काढण्यात झाला. त्यानुसार आकृतीबंध तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी रखडली. परिणामी शेकडो कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्ग-२ ची पदे कित्येक वर्षापासून रिक्त आहेत.प्रशासनाने मोटार वाहन विभागाती कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज सांगलीतील आरटीओ कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात आरटीओ कर्मचारी संघटना अध्यक्ष संतोष मदने, अमर महेकर, वीरेंद्र नागावकर, प्रताप जामदार, दिनकर पाटील, नंदकुमार पाटील, नितीन कोकने, श्रीमती लता कांबळे, श्रीमती अनिता सुतार, श्रीमती दीपा कापसे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.