मोदीजी कोणत्या साबणाने धुवून काढले? आम्ही येतो
राजकारणात तत्व, निष्ठा, विचारधारा याला आता स्थान उरलेले नाही. कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते, त्याच पक्षातले लोक राज्याच्या सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत. आम्हाला पंतप्रधान मोदींना हे विचारायचे आहे, की त्यांच्याकडे असा कोणता साबण आहे, ज्यामुळे अजित पवार स्वच्छ झाले? याचे उत्तर मोदींनी द्यावे, माझ्यासह आम्ही सगळे भाजपमध्ये यायला तयार आहोत, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. पंतप्रधान जोपर्यंत आमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांच्या क्लीप, व्हिडिओ शहरांमध्ये गावांमध्ये जावून दाखवू, सोशल मिडियावर पोहचवू, असा इशारा देखील दिला. एआय एम आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्याचे चित्र निर्माण करून राज्यातील सरकारमध्ये अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचा समावेश करून घेतला.
ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स धाडींच्या दबावाखाली हे सरकार स्थापन करण्यात आल्याचा आरोप करत एमआयएमने आज इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलतांना इम्तियाज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदीजी विदेशात जावून भाषण ठोकतात, मोठ्या गप्पा मारतात पण देशात आणि राज्यात मात्र विपरित वागतात. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या धाडी टाकून किंवा त्याची भिती दाखवून जो प्रकार महाराष्ट्रात व इतर राज्यात सत्तेसाठी भाजप करते आहे ते पाहून राजकारणाची लाज वाटायला लागली आहे. सिंचन, बॅंक घोटाळ्याचा आरोप पाच दिवसांपुर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे नाव घेवून केला होता. मग हे घोटाळेबाज, भ्रष्टाचार करणारे पक्ष आणि त्यांचे नेते लगेच स्वच्छ कसे झाले ?मोदींकडे असा कोणता साबण आहे, ज्यामुळे अजित पवार स्वच्छ झाले आणि ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसले. आम्हाला याचे उत्तर द्या, जोपर्यंत उत्तर मिळणार नाही, आम्ही तुमच्या भाषणाचे व्हिडिओ, क्लीप दाखवत राहू. अशी कोणती जादू केली ज्यामुळे भ्रष्टाचारी स्वच्छ झाले हे आम्हाला सांगितले तर आम्हीही भाजपमध्ये यायला तयार आहोत, असा चिमटाही इम्तियाज यांनी यावेळी काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.