जनतेच्या मनातला चित्रपट ' जयभीम 'च जितेंद्र आव्हाड यांची सनसनाटी प्रतिक्रिया
देशभरातल्या चित्रपट चाहत्यांना अन् प्रेक्षकांना ज्या पुरस्काराची उत्सुकता असते त्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या पुरस्कारानं अनेकांना नाराज केले असल्याचे बोलले जात आहे. ज्या कलाकृतींना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले त्यांच्यापेक्षा कित्येक उत्कृष्ट कलाकृती होत्या. असे काही नेटकऱ्यांनी म्हटले होते.
यासगळ्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. आव्हाड हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या स्वभावासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. ते परखड वक्तव्यांसाठी परिचित आहेत. अशात आव्हाड यांनी एका चित्रपटाच्या नावाचा उल्लेख करुन नव्या वादाला सुरुवात करुन दिली आहे. काही महिन्यांपूर्वी टी जे ज्ञानवेल नावाच्या दिग्दर्शकाचा जय भीम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्ञानवेल यांच्या जय भीम या चित्रपटावरुन खूपच खळबळ उडाली होती. २१ व्या शतकातही भारत देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती किती भयानक आहे याविषयी दिग्दर्शकानं प्रभावीपणे आपली कलाकृती सादर केली होती. त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून प्रचंड कौतुक केले होते. आता आव्हाड यांनी हाच धागा पकडून केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय झाला आहे.
आव्हाड यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. पण जय भीम या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील चित्रपट हा 'जय भीम' हाच होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे 'जय भीम' चित्रपटालाच.69 राष्ट्रीय पुरस्कार 2023च्या पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली. ज्यात आलिया भट्ट, क्रिती सॅनन, अल्लू अर्जुन, आर माधवन, विकी कौशल या कलाकारांनी बाजी मारली. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणुन 'सरदार उधम' तर आर माधवनचा 'रॉकेटरी द नंबी इफेक्ट्स' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार हा आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांनी मिळवला. मात्र यावेळी बोलबाला झाला तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नावाचा.साउथ स्टार 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने हा पुरस्कार मिळवत नवा इतिहास रचला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा तो पहिला तेलगू अभिनेता ठरला आहे. या खास क्षणी मनोरंजन विश्वातल्या सर्वच कलाकारांनी या विजेत्या अभिनेत्यांचे कौतुक करत अभिनंदनचा वर्षाव केला आहे. तर क्रिती सेनन आलिया आणि अल्लू अर्जूनच्या घरी देखील जल्लोष करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.