बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी
नागपूर : बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि एचसीएल टेक कंपनीने शिक्षक दिनाच्या औचित्याने 'प्रिंसिपल मीट' कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) रवींद्र काटोलकर आणि एचसीलएलचे सहायक महाव्यवस्थापक साजेश कुमार यांच्यासह उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक उपस्थित होते. बारावीनंतर आयटी कंपनीतील कामाच्या अनुभवासोबतच आवडत्या विषयात पदवी व उच्चशिक्षण पूर्ण होत आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया गुरुवारी मिहान येथील एचसीएल कंपनीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांनी दिली.
'अर्ली करिअर प्रोग्राम'द्वारे हक्काची नोकरीही मिळाली आणि शिक्षणही पूर्ण होत असल्याचे समाधान व आनंद आहे. अन्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत जीवनाचा मार्ग प्रशस्त करावा,अशा भावना आज या विद्यार्थ्यांनी 'प्रिंसिपल मिट' कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांसमोर व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये भत्ता
या उपक्रमांतर्गत २० हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या इच्छुक व २०२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ६ महिने सशुल्क प्रशिक्षण व ६ महिने लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
या ६ महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीत विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळत आहे. तर एका वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून कायम नोकरी, तसेच पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी,शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळत आहे. उच्चशिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशिप स्वरूपात देत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)