शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रय़त्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महाराष्ट्राला वित्तीय संस्थांचं केंद्र करणार असल्याचं आश्वासन ठाकरेंनी दिलं. देशात आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दुजाभाव न करता सर्व राज्यांना समान विकासाची संधी देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मागच्या काही दिवसांपासून राज्यातली आरोग्य यंत्रणा ढेपाळली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं आश्वासन ठाकरे गटाने जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे.
शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी-बियाणं जीएसटीमुक्त करणार आहोत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु आणि शेतकऱ्यांना गोदामं देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
केंद्रात सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी केंद्रात युतीचं सरकार असताना आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मुलभूत मुद्द्यांवर आम्ही काम करणार आहोत. संविधानाचं रक्षण करणं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही काम करणार आहोत.भाजप आता पराभवाच्या भीतीने राम..राम...राम करायला लागलं आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असं भाजप करत आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी राम मंदिरात का गेलो नाही, असं अमित शाह मला विचारतात. परंतु मी म्हणतो मोदीजी किंवा अमित शाह हे तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत? त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.