पुण्यात कल्याणीनगर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनीश अवधिया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोमवारी रात्री उशिरा सोपवण्यात आले. अश्विनी कोस्टा ही मध्य प्रदेशातील जबलपूरची तर अनीश अवधिया उमरियाचा होता. मृतांच्या कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीय. तसंच आरोपीला जामीन दिल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. अनिशचा भावऊ देवेशने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह चौघांना अटक केलीय.
जबलपूरमध्ये राहणारी अश्विनी कोस्टा गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहत होती. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केल्यानंतर ती पुण्यात नोकरी करत होती. काही दिवसांपूर्वी तिने घरी येऊन स्वत:चा वाढदिवस साजरा केला होता. घरात सर्वात लहान असल्यानं ती सर्वांची लाडकी होती. अश्विनीच्या भावाने म्हटलं की, आता बहीण या जगात राहिली नाही, पण दोषींवर कठोर कारवाई करावी." अश्विनी आणि अनिश एकाच कंपनीत काम करत होते. दोघेही पार्टीनंतर दुचाकीवरून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
अनिश अवधिया हा उमरिया इथं राहत होता. तरुण मुलाचं असं अपघाती निधन झाल्यानं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अनिशच्या काकांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केलीय. अनीशचा लहान भाऊ देवेशने असा आरोप केला आहे की, येरवडा पोलिसांनी आरोपीबाबत नरमाईची भूमिका घेतली. तपासाचा अधिक वेळ अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचे काय संबंध होते यातच घालवला. पोलिस आरोपींची काळजी घेत होते आणि वाढिदवसाच्या पार्टीबद्दल अनीशच्या मित्रांची चौकशी करत होते असा गंभीर आरोप अनिशच्या भावाने केला.
आरोपींना पिझ्झा बर्गर दिला की नाही?
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण तरुणीच्या नातेवाईकांना येरवडा पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचे आरोप झाले आहेत. तसंच आरोपींना पिझ्झा, बर्गर पोलिसांनी दिल्याचे आरोप अपघातातील पीडितांच्या नातेवाईकांनी केलेत. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, या अपघात प्रकरणी चौकशीसाठी अधिकारी नेमले आहेत. नातेवाईकांना वाईट वागणूक दिलेली नाही. यात कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपीला मदत करत असल्याचं आढळून आलं किंवा नातेवाईकासोबत वाईट वागल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.