Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप येणार? शंभूराज देसाई यांनी आतली बातमी फोडली

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप येणार? शंभूराज देसाई यांनी आतली बातमी फोडली 


महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण शिवसेना नेत तथा राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांना सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 

आता शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला होणार आहे. यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. कारण महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला आतून मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.


भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मोठा दावा केला. “अनेक नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मदत केली आहे. निकालानंतर तुम्हाला याची प्रचीती येईल”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. शंभूराज देसाई एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी मविआबद्दल मोठा दावा केला. “अनेक लोकांनी आतून आम्हाला मदत केली आहे. त्या गटातील अनेक लोकांनी आम्हाला मदत केली आहे. आम्ही आज त्यांची नावे सांगणार नाही. पण 4 जूननंतर महायुतीमध्ये लोंढा येईल. महाविकास आघाडीमधील अनेकांनी आम्हाला मदत केली. आता आम्ही त्यांची नावे घेऊ शकत नाही”, असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

‘महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागांवर विजय होईल’

“लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी ठाणे, कल्याण आणि मुंबईतला खासदार राहुल शेवाळे यांचा दौरा करुन आलो. खूप चांगलं वातावरण आहे. महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी आज घणसोलीत ज्या ठिकाणी सातारा-कराड या भागातली नागरीक जास्त राहतात तिथे संध्याकाळी संयुक्त मेळावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या रोड शोमुळे पूर्ण वातावरण महायुतीमय झालं आहे. महाराष्ट्रातले मतदार हे महायुतीच्या मागे उभे आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त सभा आहे. या सभेचा अजून फायदा होणार आहे. सरकारने जे काम केलं आहे त्याची पोचपावती जनता देणार आहे. महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागांवर विजय होईल”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

मोदींच्या रोड शोवर शंभूराज काय म्हणाले?

“मुंबईतील मतदार महायुतीच्या पाठीशी आहेत. मुंबईत महायुतीमय वातावरण आहे. शिंदे सरकारने जी कामगीरी केली त्याची पोचपवाती महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला मागील 4 टप्यात दिली आहे आणि मुंबईही देणार आहे. देशातील आनेक मोठ्या शहरात मोदींचे रोड शो केले आहेत. मोठ्या व्यक्तींच्या रोड शोला काही सुरक्षेच्या कारणास्तव उपायोजना कराव्या लागतात. विरोधकांच्या टीकेचा आमच्या विजयावर काही परीणाम होणार नाही”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

“मोदींच्या वेळापत्रकानुसार आम्ही रोड शो केला. कुठल्याही समाजाला समोर ठेऊन रोड शो केला नाही. निवडणुकीत कुठला समाज आहे हा विचार नसतो, कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना भेटता येईल ते पाहत आसतो”, असा खुलासा शंभूराज देसाई यांनी केला.

अजित पवार मोदींच्या रोड शोला गैरहजर का?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्यामुळे अजित पवार का नव्हते? असा प्रश्न उपस्थित केला जातो. याबाबत शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला. मी दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्यांना भेटलो नाही. अमोल मीटकरी यांना सांगितले आहे. पावसात भिजल्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली आहे. मी आज किंवा उद्या संपर्क करून माहिती घेतो”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

शंभूराज देसाई यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

“आम्ही आमच्या उमेदवारांना त्या-त्या मतादारसंघात जाहीरनामा द्यायला सांगितला आहे. आमच्या उमेदवारांनी तो जाहीर केला आहे. तुम्ही या लोकसभेत महाराष्ट्राला काही व्हिजन दिलं आहे का? उद्योग, परकीय गुंतवणुक, शेतीवर काही व्हिजन दिलं आहे का? असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना दिलं. संजय राऊत भडक वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहतात. शिंदेना रोज 4-5 रॅली, बैठका कराव्या लागतात. त्यामुळे कपडे लागतात. संजय राऊत हे धादांत खोटं बोलतात. संजय राऊत भडक बोलतात. त्यांच्या वक्तव्याची खात्री करूनच माध्यमांनी दाखवावं”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर दिली.

शंभूराज देसाई मनोज जरांगेंना भेटणार

शंभूराज देसाई यांना यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “मी निवडणुका झाल्यावर जरांगे पाटील यांना भेटून सराकारने काय काय केले आहे ते दाखवाणार आहे. तुलनात्मक त्यांना आम्ही माहीती देणार आहोत”, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.

“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि राज ठाकरेंचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यांच्या भूमीकेमुळे काही लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पवार असे बोलले असतील”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.