21 मंदिरांमधील तब्बल 1000 किलो सोने वितळवले आणि... भारतातील 'या' राज्यात नेमकं चाललंय काय?
भारतातील मंदिर सोन्याच्या खाणींपेक्षा कमी नाहीत. विशेषतः दक्षिणेकडील मंदिरांमध्ये सोन्याचा प्रचंड खजिना आहे. दक्षिण भारतातील एका राज्य सरकारने 21 मंदिरांमधील तब्बल 1000 किलो सोने वितळवले आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोनं वितळवून आलेल्या पैशांचे या सरकारने काय केले जाणून घेऊया?
तामिळनाडू राज्यात मंदिरांमधील सोनं वितळवण्यात आले आहे. येथील 21 मंदिरांमध्ये भक्तांनी दान म्हणून अर्पण केलेल्या 1000 किलोपेक्षा जास्त सोनं वितळवण्यात आले आहे. हे सोनं वितळवून 24 कॅरेटच्या बारमध्ये वितळवून बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे. सोन्याच्या बारमधील या गुंतवणुकीतून तामिळनाडू सरकार वार्षाला 17.81 कोटी रुपयांचे व्याज मिळवत आहे. मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या सोन्याच्या वस्तू ज्या वापरात नव्हत्या, त्या मुंबईतील सरकारी टांकसाळीत वितळवून 24 कॅरेटच्या बारमध्ये रूपांतरित केल्या गेल्या आणि सुवर्ण गुंतवणूक योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये गुंतवल्या गेल्या.
हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाचे मंत्री पीके शेखर बाबू यांनी विधानसभेत सादर केलेल्या धोरण अहवालात याबाबत माहिती देण्यात आली. गुंतवणुकीतून मिळणारे व्याज संबंधित मंदिरांच्या विकासासाठी वापरले जाते. या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील तीन विभागांसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 31 मार्चपर्यंत राज्यातील 21 मंदिरांमधून मिळालेल्या 10,74, 123.488 ग्रॅम शुद्ध सोन्यावर दरवर्षी 17.81 कोटी रुपये व्याज मिळाले, जे गुंतवणुकीच्या वेळी सोन्याच्या किमतीनुसार निश्चित केले गेले. मंदिरांमध्ये, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील समयापुरम येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराने गुंतवणूक योजनेसाठी सर्वाधिक 424 किलो सोने दान केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.