Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताचं युद्धाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल, शस्त्रसंधी करार रद्द करणार आणि पाकिस्तानला थेट भिडणार?

भारताचं युद्धाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल, शस्त्रसंधी करार रद्द करणार आणि पाकिस्तानला थेट भिडणार?



काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर दिल्लीत सरकारी स्तरावर वेगवान घडामोडी सुरु आहेत. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन पर्यटकांचा जीव घेतला होता. हा गेल्या काही वर्षांमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे. निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना आणि यामागील सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा दिला होता. 


आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर शिक्षा त्यांना देऊ. या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना शोधून आम्ही शिक्षा करु, असे मोदींनी म्हटले होते. तत्पूर्वी भारताने 1960 साली पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द करुन पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. यानंतर आता मोदी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असलेली शस्त्रसंधी (Ceasefire) रद्द करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. मोदी सरकारचे हे पाऊल युद्धाच्या जवळ जाणारे ठरु शकते. त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सीएनएन- न्यूज 18च्या वृत्तानुसार, सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून शस्त्रसंधी हटवण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरु आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानने सीमारेषेलगतच्या भागात हल्ला न करण्याचे वचन पाळलेले नाही. त्यामुळे आता भारताकडून शस्त्रसंधी हटवून उघड उघड शत्रूशी दोन हात करण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. शस्त्रसंधी रद्द झाल्यास पाकिस्तानी लष्करावरील दबाव वाढू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फेब्रुवारी 2021 मध्ये शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र, तेव्हापासून पाकिस्तानात मूळ असलेल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि लहानसहान दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये घुसखोरी होत आहे. पाकिस्तानी लष्कराकडूनही अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा शस्त्रसंधी करारच रद्द करुन उघडपणे पाकिस्तानशी दोन हात करण्याची योजना भारत सरकारच्या मनात घोळत असल्याची माहिती आहे.


सर्वपक्षीय बैठकी काय घडलं?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर तपशील पुरवला. तसेच केंद्र सरकारने यानंतर घेतलेल्या निर्णयांबद्दलही सर्वपक्षीय नेत्यांना सांगण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. त्यामुळे आता भारतीय सरकार याविरोधात कठोर पावले उचलेल, असे सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. केंद्र सरकार जे काही पाऊल उचलेल, त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा असेल,  असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.  




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.