“अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत!” अशी थेट टिप्पणी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप आमदारांना कडक कानमंत्र दिला आहे. नांदेडमध्ये पार पडलेल्या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीत शाह यांनी प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामं मागण्याचा सल्ला दिला. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असताना अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले - “आपली संख्या अधिक आहे, अशात मागे हटू नका!” तसेच, “कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा, प्रशासनाला थेट पाठपुरावा करा,” अशा शब्दांत त्यांनी आमदारांना उद्देशून सूचना दिल्या.
या बैठकीदरम्यान काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात तक्रारी मांडल्या. त्यावर शाह यांनी ठणकावून सांगितले की, “अजित पवारांकडे तक्रार करण्याऐवजी, तेच माझ्याकडे तक्रार घेऊन यायला पाहिजे,” असे म्हणत भाजप आमदारांनी दबावाने नव्हे, तर ठामपणे व आक्रमकपणे कामं पुढे न्यावी, अशी भूमिका स्पष्ट केली."आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले. भाजप आमदारांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी हा हस्तक्षेप करत पक्षातील असंतोषावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. त्यांच्या या सल्ल्याने महायुतीतील आंतरविरोध पुन्हा एकदा उजेडात आले असून, आगामी काळात राज्यातील राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.