फसवणूक करुन शरीर संबंध ठेवणे हा अत्याचार नाही - न्यायालयाचा धक्कादायक निर्णय
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निर्णय देताना प्रणय राजेंद्र घरडे (३०) यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला. पीडित महिलेचे यापूर्वीच लग्न झाले असल्याने आरोपीने लग्नाचे आमिष दिले आणि बलात्कार केला, असे म्हणता येणार नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने या निकालात नोंदविले.
ॲड. मंगेश राऊत यांनी केलेल्या युक्तिवादानंतर पारडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र न्यायालयाने रद्द केले. या प्रकरणावर न्या.अनिल किलोर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात, तक्रारदार महिला (३५) हिने आरोप केला होता की, जानेवारी २०२० मध्ये प्रणयने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर धमक्या देऊन अनेकदा संबंध ठेवले.
तसेच, प्रणय यांना चार ते साडेचार लाख रुपये दिल्याचा दावा केला होता, जे परत करण्यात आले नाहीत. मात्र, तपासानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रातून असे स्पष्ट झाले की, तक्रारदार महिला विवाहित असून तिचा पहिला विवाह अजूनही कायदेशीररित्या कायम आहे. यामुळे, लग्नाचे आमिष दाखवल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळला.
तसेच, न्यायालयाने तक्रारदार आणि प्रणय यांच्यातील संबंध परस्पर संमतीने होते. त्यामुळे, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(न) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा लागू होत नाही. तसेच, फसवणुकीच्या आरोपात (कलम ४२०) कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत आणि धमकीच्या आरोपात (कलम ५०६) देखील पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती.
यामुळे, न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, हे प्रकरण वैयक्तिक सूडबुद्धीने दाखल करण्यात आले आहे. असेही न्यायालयाने नमूद केले. या निकालानुसार, ४ जुलै २०२४ रोजी दाखल झालेले आरोपपत्र रद्द करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.