एपीआयच्या नावाने बनावट सही केल्याचा प्रकार आला समोर, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी साडेचार कोटी रुपये घेतल्याचा आनंद भगत
याचा दावा
वाघोली येथील १० एकर जागेच्या मालकीवरुन गेली तीन वर्ष सुरु असलेल्या दाव्यामध्ये आतापर्यंत चार अपर्णा वर्मा यांनी या जागेच्या मालकीचा दावा केला आहे. चंदननगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या ताब्यात सर्व कागदपत्रे असताना व आपण रजेवर असताना अपर्णा वर्मा (रा.दुबई) यांच्या अर्जाचे अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या कार्यालयीन टिपणीवर आपली बनावट स्वाक्षरी केली व या बनावट सहीचे आधारे येरवडा सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांच्या परवानगीने चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा बनावट गुन्हा दाखल केला असल्याचा दावा सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांनी केला आहे.
त्याचवेळी यातील एक आरोपी व पूर्वीचे फिर्यादी आनंद भगत यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यात अपर्णा वर्मा (दुबई) यांनी भगत यांना ५० लाख रुपये, शैलेश ठोंबरे यांना दीड कोटी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना साडेचार कोटी रुपये दिल्याचे पुरवणी जबाबात म्हटले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अपर्णा वर्मा (दुबई) यांचा तक्रार अर्ज, २०२३ मध्ये आनंद भगत यांची २०२३ मध्ये फसवणुकीची फिर्याद, त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांची बनावट स्वाक्षरी केल्याची फिर्याद (१५ मे २०२५), पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांच्या दोन फिर्यादी तसेच अपर्णा वर्मा यांची लोणीकंद पोलीस ठाण्यातील एक फिर्याद अशा किमान पाच फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तरीही ही जागा नेमकी कोणाची आहे, याचा अजून उलघडा झालेला नाही.
याबाबत खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्पणा यशपाल वर्मा (वय ५६, रा. दुबई) यांनी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे यांना अपर्णा वर्मा या वाघोली येथील ४ हेक्टर जागेच्या मालक आहेत, हे माहिती असताना त्यांनी अपर्णा यशपाल वर्मा (तोतया) (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अपर्णा वर्मा असे भासवून चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात २१ मार्च २०२३ मध्ये दस्त नोंदवून बनावट खरेदी खत केले असा अर्ज दिला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्याची चौकशी खांडेकर यांच्याकडे सोपविली होती. त्याचवेळी अपर्णा यशपाल वर्मा (रा. राजस्थान) आणि अपर्णा यशपाल वर्मा (रा. इस्लामपूर) यांचे मिळकती संदर्भात तक्रार अर्ज मिळाले होते. हे सर्व मुळ तक्रारी अर्ज राजेंद्र लांडगे यांच्या ताब्यात होते. सह दुय्यम निबंधक कार्यालयातून दोन दस्तांची नोंदणी झालेली नसल्याचे अभिप्राय मिळाले.
त्या आधारे अर्जदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांच्या कार्यालयामधून परवानगी मिळणेकामी कार्यालयीन टिपणी तयार करण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी खांडेकर यांना सांगितले. परंतु, १२ ते १५ मे २०२३ पर्यंत ४ दिवस किरकोळ रजेवर गेले होते. त्यामुळे त्यांनी अर्जावरुन गुन्हा नोंद करण्याची परवानगीची कार्यालयीन टिपणी तयार न करता रजेवर गेले होते. त्या काळात तक्रारी अर्जाचे सर्व कागदपत्र राजेंद्र लांडगे यांच्या ताब्यात होते. ते रजेवरुन १६ मे २०२३ रोजी परत आल्यावर राजेंद्र लांडगे यांनी परिमंडळ ४ यांचे कार्यालयामधून मंजुरी आलेली आहे, त्याप्रमाणे आपण गुन्हा नोंद करुन पुढील तपास करावा, असे तोंडी आदेश दिले. त्याप्रमाणे त्यांनी आनंद भगत यांना बोलावून त्यांच्या सविस्तर जबाब नोंदवून अपर्णा यशपाल वर्मा (वय ५६, रा. दुबई) यांच्यासह अपर्णा यशपाल वर्मा (वय ६२,रा. राजस्थान) अशा ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सध्या ते खराडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना चंदननगर पोलीस ठाण्यात १३ मे रोजी बोलविण्यात आले. त्यांना २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याची कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यात कार्यालयीन टिपणीवर आपली बनावट स्वाक्षरी कोणीतरी केल्याचे त्यांनी आढळून आले. त्यांनी तशी फिर्याद चंदननगर पोलीस ठाण्यात दिली आहे.सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर यांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्राने गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळविण्यात आली. आनंद भगत याने अपर्णा वर्मा (दुबई) यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात खटला दाखल केला. आनंद भगत याने दिलेली २०२३ मध्ये दिलेली फिर्याद खोटी असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व गुन्ह्यांचा तपास करताना चंदननगर पोलिसांनी आनंद भगत याच्या घरी झडती घेतली. त्यात काही बनावट कागदपत्रे आढळून आली. त्यात अपर्णा यशपाल वर्मा (इस्लामपूर) हिचे खरे नाव अर्चना पटेकर असे आहे. तर, अपर्णा यशपाल वर्मा (रा. राजस्थान) हिचे खरे नाव संगिता ससे (रा. अहमदनगर, आताचे अहिल्यानगर) असे असल्याचे निष्पन्न झाले.आनंद भगत याचा पुरवणी जबाब नोंदविण्यात आला. त्यात जानेवारी २०२४ मध्ये लांडगे यांनी आपल्याकडे असलेली अपर्णा वर्मा (सांगली) हि बनावट असलेबाबत सांगितले होते. त्यावेळी मी त्यांना या प्रकरणामधून मला बाहेर काढा, मला हे काहीच नको, असे म्हणालो. त्यामुळे माझे व राजेंद्र लांडगे यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले होते. अपर्णा वर्मा (दुबई) हिच खरी असल्याचे मला समजु लागले. मी अपर्णा वर्मा (दुबई) यांच्याशी समजुतीचा करारनामा करुन मला २ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यामधून त्यांनी मला ५० लाख रुपयांचा डीडी दिला होता. उरलेले पेमेंट शैलेश ढोंबरे यांनी माझे परस्पर दीड कोटी रुपये घेतले.
अपर्णा वर्मा (दुबई) यांच्याकडून देखील शैलेश ठोंबरे व राजेंद्र लांडगे यांनी साडेचार कोटी रुपये रोख रक्कम घेतली असल्याचे समजले आहे. मला ५० लाख रुपये मिळाल्यानंतर कोर्टात सेटलमेंट कागदपत्र तयार करुन जमा केली, असे आनंद भगत यांनी आपल्या पुरवणी जबाबात म्हटले आहे. याबाबत तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांनी सांगितले की, या प्रकरणात इतकी गुंतागुंत आहे की, अजूनही ती मोक्याची १० एकर जागा नेमकी कोणाची आहे, हे सांगता येत नाही. याप्रकरणात लोणीकंद पोलीस ठाण्यात आणखी एका अपर्णा वर्मा यांनी अर्ज केला आहे. या प्रकरणाच्या तपासात पुढे आलेल्या पुराव्यानुसार फसवणुकीचे व बनावट कागदपत्रे तयार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.