एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांबाबत आता विविध ठिकाणांहून हृदय हेलावून टाकतील अशा गोष्टी समोर येत आहेत. या विमानात बसण्यापूर्वी अनेकांचे सेल्फी, फोटो सोशल मीडियावर येत आहेत. यापैकीच एक आहे तो डॉ. कोमी व्यास यांचा. त्यांनी महिन्यापूर्वीच नोकरीचा
राजीनामा दिला होता व लंडनला पती व तीन मुलांसह कायमचे शिफ्ट होत होते.
परंतू, त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर
इंडियाच्या विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील पाच जणांचे अख्खे कुटुंब
उध्वस्त झाले आहे. प्रतीक जोशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह विमानातून
प्रवास करत होते. प्रतीक हे सहा वर्षांपूर्वीच लंडनला स्थलांतरीत झाले
होते. परंतू, त्यांची पत्नी डॉ. कोमी व्यास व तीन मुले इथेच होती. आता ते
कायमचे लंडनला राहण्यास जात होते. यामुळे कोमी यांनी उदयपूरमधील पॅसिफिक
हॉस्पिटल उमरदा येथे देत असलेल्या सेवेचा राजीनामा दिला होता. दोन
दिवसांपूर्वीच त्या नोकरीतून मुक्त झाल्या होत्या. परंतू, नियतीला काही
वेगळेच मंजूर होते.
प्रद्युत जोशी, मिराया जोशी आणि नकुल
जोशी या मुलांसह हे दोघे दाम्पत्य लंडनला निघाले होते. यात जुळी मुले आहेत.
विमानात बसताना या दोघांनी मुलांसोबत सेल्फी काढले होते. ते त्यांनी सोशल
मीडियावर आणि नातेवाईकांना पोस्ट केले होते. संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये
स्थायिक होण्याच्या उद्देशाने या विमानात बसले होते. प्रतीकने बऱ्याच
दिवसांपासून त्याची पत्नी आणि मुलांनाही लंडनला घेऊन जाण्याची योजना आखली
होती. तिथे नव्या आयुष्याला सुरुवात करणार होते. विमान अपघाताने त्यांची
स्वप्ने क्षणात उध्वस्त करून टाकली आहेत.
राजस्थानच्या १० प्रवाशांचा मृत्यू...
या विमान दुर्घटनेत जोशी कुटुंबासह राजस्थानच्या दहा जणांचा मृत्यू झाला आहे. उदयपूरमधील चार आणि बालोत्रा येथील खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. उदयपूर शहरातील संगमरवरी व्यापारी पिंकू मोदी यांचा २४ वर्षीय मुलगा शुभ आणि २२ वर्षीय मुलगी शगुन मोदी यांच्याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील रुंदेडा गावातील वरदी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया यांचाही मृत्यू झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.