... अन्यथा जमावाने अशोक सराफ यांचे तुकडे केले असते, नाना पाटेकर खांद्यावर उचलून धावले होते; स्वतः सांगितला किस्सा
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यानंतर फक्त मराठीच नव्हे तर सर्व चित्रपटसृष्टी आणि जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशोक सराफ यांनी नेहमीच मराठी नाटक, मालिका आणि चित्रपसृष्टीसाठी भरीव योगदान दिलं आहे. त्यांच्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र आहेत. पण त्यांच्या एका मित्राचं नाव ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटतं, ते म्हणजे नाना पाटेकर आहेत.
तसं पाहायला गेल्यास दोघंही प्रत्येक बाबतीत एकमेकांच्या विरुद्ध असताना, त्यांची मैत्री मात्र घट्ट आहे. यामागे कारणंही तशीच आहेत, ज्यांचा खुलासा स्वतः अशोक सराफ यांनी केला होता. झालं असं होतं की, अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता. त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रसंगावधान दाखवत अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असतं असं अशोक सराफ यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं.
नेमकं काय घडलं होतं?
एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं होतं. "हमिदाबाई नाटकाच्या वेळी नीट दिसत असल्याने लोकांनी गोंधळ घातला होता. पाच मिनिटात पडदा खाली पडल्यानंतर हळूहळू गडबड वाढू लागली. प्रेक्षक संतापले आणि सगळ्या खुर्ध्या तोडून टाकल्या, ट्युबलाईट फोडल्या. लोकांनी बसच्या काचा फोडल्या. नाना पाटेकरला संभाव्य धोक्याची कल्पना आली होती. त्याला मी टार्गेट आहे हे लक्षात आलं. त्यावेळी नाना पाटेकरने मला तेथून अक्षरशः पळवलं होतं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरशः धावत होता," अशी आठवण त्यांनी सांगितली होती. "ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वतः चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. मी नानाचे उपकार विसरु शकत नाही. जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे केले असते," अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती.
"नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता. आम्ही एकत्र काम केलं होतं. एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले. पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. पण हमीदाबाईची कोठी नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्र होतो. हमीदाबाईची कोठीदरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणारा आहे त्यामुळे जास्त आहे. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव आठवला. तो खडूस वाटतो, पण तसा तो नाही. तो सरळ आहे, फक्त स्पष्टवक्ता आहे. पण तो त्याचा गुणच आहे. मैत्रीला एकदम छान माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ शकतो. अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे," असं सांगत अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतची मैत्री उलगडली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.