Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया

सांगली :- भाजप प्रवेशाची चर्चा अन् जयंत पाटलांची मिश्किल प्रतिक्रिया


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत, तसेच त्यांनी यावेळी माध्यमांना देखील सुनावलं आहे.

तुम्ही माय बाप आहे, तुम्ही चालवलं तेच चालणार. मी इथेच आहे, पक्षाचा मेळावा घेतोय. तुम्ही असं का करता मला माहीत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

भाजपा फार मोठा पक्ष आहे. त्यामुळे मला गरिबाला का सारखं वेठीस धरता. माझ्या भेटी वेगळ्या कारणासाठी होतात. विरोधी पक्षाचे नेते भेटू शकत नाहीत का? असा सवाल यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलता ते म्हणाले की, हे सर्व थांबवा. तुम्ही पक्षांतरासाठीच भेटलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बातमी चालवता मलाही प्रसिद्धी मिळते, माझीही कामं होतात असा खोचक टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर देखील प्रतिक्रिया दिली. यावर्षी पूर येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पूर येऊ नये यासाठी सरकारने लक्ष घातलं पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्य वेळी पाणी सोडलं पाहिजे आणि योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे त्या भागातील लोकांनी जी मतं मांडले आहेत आंदोलनं केली आहेत सरकारने त्यांचं म्हणणं न ऐकता ज्यांनी आंदोलन केले नाही अशा लोकांना सरकारने बोलावले आहे. मात्र सरकारने ज्यांनी आंदोलन केलं आहे, अशा लोकांना बोलावून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजे, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते वसंतदादांपर्यंत या कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. पण आता परिस्थिती बदलली आणि काही वेगळे निर्णय झाले, यावर मी बोलणार नाही, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.