माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पवार म्हणाले, "धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते आणि तिथूनच त्यांनी कोट्यधीश होण्याचा प्रवास सुरू केला." मात्र, त्यांच्या भाषणातील "सोडण्याचं" हे शब्द सोशल मीडियावर "चोरण्याचं" असं दाखवून व्हायरल करण्यात आलं. यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं की, "माझ्या बोलण्यात चुकीचा शब्द आला असेल, तर मी राजकारण सोडायला तयार आहे."
अजित पवारांनी तरुणांना प्रेरणा देताना सांगितलं की कोणतंही काम छोटं नसतं. "धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम करत मोठी स्वप्नं साकारली. त्याचप्रमाणे मेहनतीतून यश गाठता येतं. मीही पेट्रोल पंप सुरू करू शकलो असतो, पण सहकार टिकवणं मला अधिक महत्त्वाचं वाटलं," असं त्यांनी स्पष्ट केलं. या वक्तव्यानंतर अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून अजित पवारांवर टीका करत सिंचन घोटाळ्याचा आणि MSCB घोटाळ्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "पंपावर पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? घोटाळे करून काय मिळवलं?" त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हटलं, "मराठीत एक म्हण आहे - 'ध' चा 'म' करणे. दमानिया यांनी हेच केलं. 'सोडलं' ला 'चोरलं' करून खोटं चित्र उभं केलं." या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.