Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'एआय'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटीचा डाव - रघुनाथ पाटील

'एआय'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटीचा डाव - रघुनाथ पाटील


सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणून शेतीमध्ये वापरायला सांगून शेतकऱ्यांना लुटू पाहत आहेत. वेगवेगळी संसाधने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारून कर्जबाजारी करण्याचे काम बारामतीकरांनी (शरद पवारांनी) सुरु केले आहे.


शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात शेतकरी संघटना कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण दौरा करून शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील व शिवाजीराव नांदखिले यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, राज्य सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्य बँक, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय) वापर करून ऊस उत्पादन वाढेल ही भूमिका मांडली आहे. आतापर्यंत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुष्कळ प्रयत्न करून व स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून एकरी १३० टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. परंतु, साखर कारखान्यांनी उत्पादन खर्चाइतकाही भाव उत्पादकांना दिलेला नाही. त्यामुळे सोसायट्या, बँका, पतसंस्था, खाजगी सावकार यांच्या कर्जात शेतकरी अडकला आहे.

या शेतकऱ्यांना पुन्हा एकरी ५० हजार रुपयांचे कर्ज देऊन वेगवेगळी साधने देऊन कर्जबाजारी करण्याचे काम खासदार शरद पवार यांनी सुरु केले आहे. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भेसळीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायद्याने दरवर्षी सुमारे ४० हजार कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे पशुधन देशोधडीला लागले आहे. साखर कारखान्यांनी एस.एम.पी.चा कायदा बदलून एफ.आर.पी. आणला. त्यामुळे १४ दिवसात भाव मिळण्याचा फौजदारी अधिकार करण्याचा अधिकार गेला. त्याचबरोबर उपपदार्थांतील ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळत होती. तीही एफआरपीच्या कायद्यात गेली. या सर्व कारणांनी महाराष्ट्रातील शेतकरी हे देशोधडीला लागले आहेत.

यावेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मण पाटील, परशुराम माळी, आबासाहेब वावरे, अरुण पाटील, नानासाहेब काणे, अरूण क्षीरसागर, हणमंत पाटील, माणिक पाटील, शिवाजी दुर्गाडे, संदीप पाटील उपस्थित होते.

सहकारामुळे महाराष्ट्राची अधोगती

महाराष्ट्रापेक्षा दारिद्र्यात असलेले बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम, ओडिसा ही राज्ये आपल्या पुढे गेली आहेत. शेजारच्या कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्वच राज्याने कितीतरी प्रगती केली आहे. महाराष्ट्राची अधोगती कशी काय झाली, त्याला महाराष्ट्रातील सहकार जबाबदार आहे, अशी टीका रघुनाथ पाटील यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.