Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरांगेंच्या मराठा आंदोलनावर नितेश राणेंचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप, म्हणाले 'लॉजवर सर्वांच्या...'

जरांगेंच्या मराठा आंदोलनावर नितेश राणेंचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप, म्हणाले 'लॉजवर सर्वांच्या...'
 


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईत आंदोलन करत असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी 'झी 24 तास'शी संवाद साधताना म्हटलं आहे. मराठा समाजाला सहकार्य करण्याची आणि त्यांची प्रगती व्हावी अशी सरकार आमची सर्वांची भावना आहे असल्याचंही ते म्हणाले आहेत.


"मनोज जरांगे आणि आमची तशी जुनी ओळख आहे. ते तसे अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. मराठा समाजाचं भलं व्हावं, आरक्षण मिळावं, मराठा मुलांना, मुलींना रोजगार मिळावा ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि भाजपा-शिंदेंचं सरकार होतं तेव्हा 10 टक्के मराठा आरक्षण दिलं आहे. तेदेखील कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आणि कोणाचं 1 टक्का आरक्षण कमी न करता 10 टक्के आऱक्षण दिलं आहे. आता त्याव्यतिरिक्त आरक्षण हवं असेल तर सरकारकडून उपसमिती स्थापन आहे. विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहे. त्यांच्यात चांगला संवाद सुरु आहे," असं नितेश राणे म्हणाले आहेत. 
 
"जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार किंवा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची बदनामी करण्याचा कार्यक्रम कोणी करत असे तर सरकार म्हणून सगळी माहिती आमच्याकडे आहे. पेट्रोलसाठी पैसे कोण देत आहे. त्या मार्गावर लॉजवर राहण्याची सोय कोण करत आहे या सगळ्याची माहिती आहे," असा इशाराही त्यांनी दिला आहे. "समाजाबद्दल सरकारची भावना चांगली आहे. मराठा समाजाला सहकार्य करण्याची आणि त्यांची प्रगती व्हावी अशी आमची सर्वांची भावना आहे," असंही ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंनी दिली चिमणी, चिचुंदरीची उपमा
मनोज जरांगे यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "तुम्ही मराठ्याचे असताना सेवा करायला हवी. जे करतात त्यांची नावं कशाला सांगत आहात. तुम्हाला वाटत असेल मदत करावी तर मग करा ना. मराठे उपाशी मरावेत असं वाटतं का? किती दिवस मराठे असूनही देवेंद्र फडणवीसांचे बूट चाटणार आहात? कधी तरी गरिबांच्या मदतीला या. 96 कुळी मराठा स्वत:ला समजतो, मग कशाला लेंड्या गोळा करत आहात? कोण देतंय याचा काय तपास लावणार आहे. गोरगरिब मराठे वर्गणी काढतात ते खरे 96 कुळी आहेत".

"मी त्यांना फार दिवसांपासून ओळखतो. मी फक्त त्यांच्या मोठ्या भावाला, दादांना मानतो म्हणून त्यांना यांना बोलायला लावू नका सांगितलं आहे. पण बहुतेक आता त्यांना मंत्रीपद जाण्याची भीती आहे. मी निलेश राणे यांना बोलायला लावू नका सांगितलं होतं. यांना झोडणार असं म्ह़टलं होतं," असा खुलासा त्यांनी केला आहे. "कोणी ना कोणीतरी खाऊ घालणारच. पण आम्ही घरुनच सर्व घेऊन गेलो आहोत. जे चोऱ्या करतात त्यांना दुसऱ्यांना चोरी केलं असंच वाटत असतं. इतरांचे कष्टाचे पैसे आहेत. लोकांनी मनाने पेट्रोल, डिझेल, वर्गणी दिल्या आहेत. कोणी देत असेल तर देणाऱ्याचं कौतुक करत तुम्हीही दिलं पाहिजे तर 96 कुळी आहात," असंही त्यांनी सांगितलं.

"प्रवासात चिमणी गाडीवर धडकली तर बाजूला पडून ओरडते. तसंच ते करत आहेत. त्यांना तशी बोलण्याची सवय लागली आहे. चिचुंदरी लोकांच्या तंगड्यातून पळत असते. तिचं घाबरगुंडीचं कामच असतं," असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रीपद जाऊ नये यासाठी ते बोलत असून, त्यांचं मंत्रीपद नक्की जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली. डुकराप्रमाणे खाण्याची सवय आहे. 96 कुळींचा एकही गुण त्यांच्यात नाही. असते तर लगेच मराठ्यांच्या सेवेसाठी पोहोचले असते अशी टीकाही त्यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.