राजस्थान आणि मध्य प्रदेशात सरकारी रुग्णालयांमधून मोफत वितरीत करण्यात आलेल्या खोकल्याच्या सिरपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे सिरप पिल्यानंतर राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तर, भरतपूरमध्ये एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
मृत मुलगा पाच वर्षाचा असून त्याला २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० च्या सुमारास खोकल्याचे औषध देण्यात आले. रात्री ३:३० वाजता त्याला उचकी लागली. आईने पाणी दिले, पण सकाळी त्याने डोळे उघडले नाहीत. कुटुंबीयांनी त्याला सिकर येथील एसके रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताचा काका बसंत शर्मा यांनी सिरप दिल्यानंतरच प्रकृती बिघडल्याचा दावा केला आहे. तर, एसके रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. केके अग्रवाल यांनी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगितले आहे.भरतपूर जिल्ह्यातही सरकारी आरोग्य केंद्रातून मिळालेले खोकल्याचे औषध पिल्याने ३ वर्षांच्या मुलाची प्रकृती खालावली. हे औषध पिल्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि त्याचे हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले. त्याला ताबडतोब जयपूरमधील जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, बयाना येथील सीएचसीचे प्रभारी डॉ. ताराचंद योगी यांनी स्वतः हे सिरप पिऊन पाहिले, ज्यामुळे त्यांचीही प्रकृती बिघडली. खबरदारी म्हणून संबंधित खोकल्याचे औषधाचा पुरवठा आणि वितरण तात्काळ थांबवण्यात आले. या खोकल्याच्या औषधामुळे देशभरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली असून, प्रशासनाने तातडीने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.