Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इराण - अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला

इराण - अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला



आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच हळदीलाही बसला आहे. सांगलीच्या हळदीला जगभरात प्रचंड मागणी आहे. यंदा हळदीचे उत्पादनही चांगले आले आहे. आखाती युद्धाला सुरवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार 14,500 पासून 24 हजरपर्यंतचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी उतरला आहे. मुंबईच्या जेएनपीटी बंदरात हजारो टन हळद अडकल्याने शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. विशेषतः मुबंई येथून आखाती देशात निर्यात करणाऱ्या शिपिंग कंपन्यानी हळद परत घेऊन जावा, असा निरोप सांगलीतील व्यापाऱ्यांना दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. युद्ध अजून किती लांबणार यावर या हळद व्यापाराचे भवितव्य आता अवलंबून असणार आहे. .


हळदीची निर्यात विस्कळीत
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग विस्कळीत झाले असून, निर्यातीसाठी तयार असलेली सुमारे 1000 टन हळद मुंबई बंदरात अडकून पडली आहे. याचा थेट परिणाम हळदीच्या दरांवर झाला असून, प्रति किंटलमागे सरासरी 1000 रुपयांची घट झाल्याने व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. सांगलीसह महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागातून आखाती देश, युरोप आणि अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर हळद निर्यात केली जाते. सध्या हळदीचा हंगाम पूर्ण जोमात असून निर्यातदार व्यापाऱ्यांनी सुमारे 50 कंटेनर मुंबई बंदरात पाठवले होते. मात्र, इराणजवळील जलमार्गावर युद्धाचे सावट असल्याने जहाजांची वाहतूक थांबवली आहे. परिणामी, सुमारे 1000 टन हळद बंदरात अडकली असून, ही हळद पुन्हा परत घेऊन जाण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हळदीचा हंगाम दीड महिन्यापूर्वी सुरू झाला असून यंदा आवक आणि दर दोन्ही चांगले होते. मात्र, आता निर्यातीचे मार्ग बंद झाल्याने सांगलीच्या हळद बाजाराला या युद्धाची चांगलीच झळ पोहोचल्याचे चित्र दिसून येत आहे. क्विंटलमागे सरासरी 1000 रुपयांची घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यंदा हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा अपेक्षित होता. मात्र, इराण-अमेरिका संघर्षाचा फटका थेट सांगलीच्या हळद बाजारपेठेला बसला.

बंदरातील हळद खराब होण्याची शक्यता

निर्यातीसाठी गेलेले कंटेनर अडकल्याने माल परत घेण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. याचा परिणाम दरावर होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मालाचा उठाव थांबल्याने दरात मोठी घट झाली आहे. 'युद्ध असेच सुरू राहिल्यास बंदरातील हळद खराब होण्याचा धोका आहे. माल परत आणण्याचा खर्च आणि दरातील घट यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे,' अशी भीती व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.हे युद्ध लांबले, तर केवळ हळदच नव्हे, तर इतर शेतीमालाच्या निर्यातीवरही याचा परिणाम होईल. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांनी पुढील पावले सावधगिरीने उचलण्यास सुरुवात केली आहे.

जळगावचा चटई व्ययसायही अडचणीत
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आशिया खंडात अग्रेसर असलेल्या चटई उद्योग ही आता अडचणीत सापडला आहे.आखाती देशात निर्यात होत असलेली जळगावची चटई आता युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात होऊ शकत नसल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका चटई उद्योगाला बसला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.