पालघर : आर्थिक देवाण-घेवाण किंवा पैशाच्या व्यवहारातून अनेकदा गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडतात. खंडणी, सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो. तर, उद्योग व्यवसायातूनही स्पर्धात्म कटकारस्थान रचले जाते. पालघर जिल्ह्याच्या वसई पूर्व मधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील जीएसएम फॉइल्स लिमिटेडचे भागीदार मोहनसिंह लक्ष्मणसिंह परमार यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी (Police) मोठा खुलासा केला आहे. कंपनीवरील पूर्ण ताबा मिळवून सुमारे ₹३२ कोटींचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा हत्येचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
उद्योगपती परमार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह सात आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सागर भानुशाली आणि मोहनसिंह परमार हे कंपनीचे भागीदार होते. शेअर बाजारातील मोठ्या तोट्यामुळे सागर भानुशाली आर्थिक संकटात सापडला होता. त्यानंतर त्याने परमार यांना कंपनीतील हिस्सेदारी विकण्यास प्रवृत्त केले आणि त्याबदल्यात सुमारे ₹३२ कोटींचा व्यवहार झाला. मात्र, ही रक्कम परत करण्याची वेळ येऊ नये आणि कंपनीवर संपूर्ण नियंत्रण मिळावे, या हेतूने परमार यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.24 जुलै रोजी कंपनीबाहेर पडताच भाडोत्री शूटरने परमार यांच्यावर जवळून गोळी झाडली. दुसरी गोळी न सुटल्याने पिस्तुलाच्या बटाने त्यांच्या डोक्यावर वार करून आरोपी पसार झाले. या हल्ल्यात उद्योजग परमार गंभीर जखमी झाले होते, परमार यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शूटर व शस्त्रपुरवठादारांसह सात आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती संजय शिंत्रे (अप्पर पोलीस आयुक्त, एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्तालय) यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.