Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झुंड, पावनखिंड: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला का फुटलंय तोंड?

 झुंड, पावनखिंड: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला का फुटलंय तोंड?


'झुंड' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण त्या चर्चेनं जातीभेदाचं वळणंही घेतल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा वादावरही त्यातून पुन्हा चर्चा होते आहे. नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनेता असल्यानं प्रदर्शित होण्याआधीपासूनच 'झुंड'विषयी उत्सुकता ताणली गेली होती. तसं कुठलाही चित्रपट आला, की तो आवडलेले आणि न आवडलेले असे दोन गट पडतात. पण झुंडच्या बाबतीत लोकांच्या प्रतिक्रियांची जातीनुसार वर्गवारी करण्याचा प्रयत्न काहींनी केला.

कट्टर चाहत्यांच्या फिल्मविषयीच्या भावना तीव्र असतात आणि ते त्या तीव्रतेनं मांडतातही. मात्र 'आपला' आणि 'परका' अशी विभागणी सोशल मीडियावर होताना दिसू लागली. झुंड, पावनखिंड, गंगूबाई काठियावाडी, यापैकी कुठल्या कुठल्या चित्रपटाला सपोर्ट करायचं हे ठरवताना हे लोक दिग्दर्शकाच्या जातीचा आधार घेत आहेत. जातीच्या आधारे झुंड पाहावा की पावनखिंड यावरूनही सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. पावनखिंडमधलं मुख्य पात्र असलेले बाजीप्रभू देशपांडे हे जातीनं कायस्थ होते आणि या चित्रपटातले अनेक कलाकार कोकणस्थ ब्राह्मण आहेत, अशी किनारही या चर्चेला आहे.

जात वास्तवावरचं भाष्य

एरवी गावकुसाबाहेर, 'भींतीपलीकडे' असलेल्या लोकांना नागराज मंजुळेंनी फँड्री, सैराट आणि अन्य चित्रपटांमधून प्रकाशझोतात आणलं. त्यांचे चित्रपट समाजातल्या जात वास्तवावर भाष्य करणारे आणि लोकांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजन घालणारे म्हणून नावाजले गेले. झुंडचाही त्याला अपवाद नाही. ट्रेलरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभे असलेल्या अमिताभ यांची एक फ्रेम दिसली, तिच्यातही याच गोष्टीचं प्रतिबिंब पडलं. बाबासाहेबांचं हे चित्रण आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं नागराज मंजुळे बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

पण नागराज असे पूर्वग्रह मोडून काढत असताना, त्यांच्या काही चाहत्यांनी त्याच पूर्वग्रहातून आपली मतं व्यक्त होत आहेत. दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांना काहीसा असाच अनुभव आला आणि त्याविषयी त्यांनी फेसबुकवर लिहिलंही आहे. झुंडच्या ट्रेलरवर शुभेच्छा दिल्या, तेव्हा एका व्यक्तीनं 'तुम्ही आणि सुमित्रा भावे 'झुंड' सारखा चित्रपट करू शकला नाहीत, कारण तुमची ती लायकीच नाही' अशा आशयाची कमेंट केल्याचं सुकथनकर सांगतात.

https://www.facebook.com/sunil.sukthankar/posts/10220023683958791

ते म्हणतात, "प्रत्येक चित्रपट आपापलं जातवास्तव घेऊनच येत असतो. विषय-आशय मांडणी सगळ्यांत एक राजकारण दडलेलं असतं, असायलाच हवं. अगदी टाईमपास म्हणून बनवले गेलेले चित्रपटही यापासून दूर राहू शकत नाहीत. प्रश्न एवढाच उरतो की त्या त्या जातीतल्या प्रस्थापित व्यवस्थेतल्या हिणकस गोष्टींना तो चित्रपट सवाल करतो की फक्त त्या त्या जातीची खोटी फुगवलेली 'अस्मिता' गोंजारतो!" ते पुढे म्हणतात, "चित्रपट दुनियेची जाती-पोटजातीत विभागणी करायला टपलेल्या विविध भक्तांनो, आधी उठा आणि निरनिराळे चित्रपट आळस न करता पहा. मग बोला !"

ही वर्गवारी कशासाठी?

उजव्या विचारसरणीच्या स्तंभलेखिका शेफाली वैद्य यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. "इतका राग होता 'उच्चवर्णीय प्रस्थापितांवर' तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?" असा प्रश्न त्यांनी विचारला आणि जातीचा मुद्दा आणखी चर्चेत आला.चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेकांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "जात जात नाही, तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. झुंड सिनेमा म्हणून पाहा."अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ म्हणतात, "हिंदीबद्दल शेअर केलं तर मराठीबद्दल का नाही केलं? मराठी केलं तर 'त्यांचं' च केलंस 'आमचं' का नाही केलं! आडनावं पाहिली जातायेत! अरे!!! म्हणजे सगळं येऊन शेवटी 'तिथंच' अडतंय!"

हेमांगी पुढे लिहितात "किती काळ आणि वर्ष जाणार आहेत अजून त्यांचं आमचं मिटवायला? मग कशासाठी आणि कोणासाठी बनतायेत सिनेमे? ज्यांनी खरंच बघायची गरज आहे ते चाललेत आपले कट्टरतेच्या दिशेने. ज्याचा शेवट भयंकरच आहे. बरं हे भयंकर आहे हे कुणाला वाटतंय? तर मधल्या लोकांना! मस्त!"

https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5470491236303794


लेखक-दिग्दर्शक आणि समीक्षक गणेश मतकरी फेसबुकवर लिहितात, "झुंड, बॅटमॅन, पावनखिंड, गंगूबाई यांचे सोशल मिडियावर एवढे गट का पडलेत? गेल्या वर्षी काहीच पाहाता येत नव्हतं. आता येतंय तर पहा मजेत सगळेच किंवा कोणतेही."

मतकरी यांनी आणखी एका पोस्टमध्ये झुंडचं समीक्षण करणारे मुद्दे मांडले आहेत. "ते म्हणतात, चित्रपट म्हणून झुंड मधे निश्चितच काही त्रुटी आहेत. पण तरीही तो जरुर चालावा आणि अधिकाधिक लोकांनी तो पाहावा. कारण तो जे सांगतोय ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही."

एखाद्या कलेचा आस्वाद न घेता, चित्रपट न पाहताच त्याविषयी आपलं मत बनवणं योग्य नसल्याचं लेखक आणि माजी संपादक गणेश कनाटे सांगतात.

ते लिहितात "आता कलाकृती बघण्याआधीच ती निर्माण करणाऱ्या कलावंताची जात, धर्म, लिंग, राष्ट्रीयता बघून काही मंडळी कलाकृतीबद्दल स्वतःची ठाम मतं बनवून ती समाजमाध्यमांवर पेरून इतरांची मतं कलुषित करण्याचे काम करू लागली आहेत."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.