महामंडळाच्या अधिवेशनाला येणार आणि समस्या विधीमंडळात मांडणार.. -जयंतराव पाटील
सांगली दि. १२ : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे खासगी शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवते. शिक्षण संस्थानी महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी विधिमंडळात महामंडळाची भूमिका मांडून बहुजन शिक्षण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आपले प्रतिनिधीत्व करीन असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी केले.
आज राजारामबापू नगर साखराळे येथे महामंडळाचे कोषाध्यक्ष व अधिवेशन स्वागताध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आ. पाटील यांना महामंडळाच्या दि. २ ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले त्यावेळी ते बोलत होते. या भेटीच्या नियोजनात मौजे डिग्रज येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे शिक्षण संस्थेचे चेअरमन व लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी समितीचे सदस्य भालचंद्र पाटील यांनी सहयोग दिला.
रावसाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची स्थापना व अधिवेशनाची रुपरेषा विषद केली तसेच पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे ती रद्द करून संस्थांना पूर्वीप्रमाणे नोकर भरती अधिकार देऊन प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या १००% रिक्त जागा तातडीने भरणे, शिक्षकेतर आकृतीबंध व वेतनश्रेणीतच सर्व रिक्त जागी नेमणूका, तुटपुंज्या वेतनेतर अनुदान वितरणात वाढ करुन पूर्वी प्रमाणे१२% देणे इ. गंभीर प्रश्न मांडले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी शिक्षण क्षेत्रातील काही समस्या मांडून विधीमंडळात संस्था व लोकप्रतिनिधी म्हणून शासनासमोर कैफियत मांडा अशी मागणी केली. यावेळी भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पाटोळे, एम.एस.रजपूत, संजय यादव व सावनकुमार दरुरे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
