गावठी विषारी दारू प्यायल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असतात. मात्र, अशा गोष्टींना ब्रेक लावणं प्रशासनाला शक्य झालेलं नाही. पंजाबमधील अमृतसरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 14
जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात
येतंय. 6 जणांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कशी घडली घटना?
अमृतसरमधील मढई आणि मजिठा भागली या गावात ही घटना घडली आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृतांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे पाच गावांमधील लोकांना त्रास होत असल्याची माहिती आहे. बनावट दारूमुळे ही घटना झाल्याची माहिती असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस काय म्हणाले?
अमृतसर ग्रामीण पोलीसचे एसपी मनिंदर सिंग यांनी मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अमृतसर मनिंदर सिंग म्हणाले, "आम्हाला काल रात्री 9:30 च्या सुमारास माहिती मिळाली की विषारी दारू पिऊन लोक मरत आहेत. आम्ही तातडीने कारवाई केली आणि चार जणांना ताब्यात घेतलं. आम्ही या दारूच्या पुरवठा करणाऱ्या प्रभजीत सिंगला अटक केली आहे."पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान प्रभजीत सिंगने मुख्य पुरवठादार साहब सिंगचं नाव सांगितलं. पोलिसांनी त्यालाही पकडलं आहे. त्यानं ही दारू कोणत्या कंपन्यांकडून खरेदी केली याचा आम्ही तपास करत आहोत. पोलीस अधिकारी म्हणाले, आम्हाला पंजाब सरकारकडून बनावट दारू पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मिळाले आहेत. त्यासाठी छापे टाकले जात आहेत आणि लवकरच दारू बनवणाऱ्यांनाही पकडले जाईल. वेगवेगळ्या कलमांखाली दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच आता पोलिसांना या प्रकरणात गावठी दारू पिलेल्या लोकांना घरोघरी जाऊन शोधावं लागतंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.