संविधानामुळेच महिलांना ‘माणूसपणा’ची वागणूक ज्योती आदाटे; विट्यात अग्रणी सोशल फाऊंडेशनच्यावतीने महिला संविधान परिषद
सांगली : स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती. परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे महिलांना माणूसपणाची वागणूक मिळते आहे. संविधानामुळेच सन्मान मिळत आहे. हे संविधान आता धोक्यात आलेले आहे, ते वाचविण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केले.
विटा येथे अग्रणी सोशल फाऊंडेशनच्यावतीने महिला संविधान परिषद पार पडली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सक्षम फौंडेशनच्या संस्थापिका पूजा विशाल पाटील होत्या. ज्योती आदाटे पुढे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय दिला. महिलांवर, शोषित समाजावर आदिवासींवर होणारे अन्याय संपविले. मतदानाचा, शिक्षणाचा, प्रसुती रजेचा, महिला आरक्षणाचा, वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत समान हक्काचा अधिकार दिला. परंतु या सहजासहजी मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत राहिली नाही. अजूनही महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत.आणि आपण ते सहन करतोय. स्वत:चा मेंदू गहाण ठेवून अंधश्रद्धेत अडकून पडलोय. आपण आपले मानसिक, भावनिक, शारीरिक शोषण करू देतो. याचे आपल्याला काहीच वाटत नाही. किंबहुना शोषण होतेय याची जाणीवच आपल्याला होत नाही, हे वेदनादायी आहे. काहीतरी मिळवायचे म्हणून उपास तापास व्रतवैकल्ये, भोंदूबाबा यांच्या नादाला लागून आपणच आपले आणि पुढील पिढीचे आयुष्य बरबाद करतोय. हे सर्व थांबवायचे असेल तर आपण स्वावलंबी झाले पाहिजे. परावलंबी जीवन अतिशय किळसवाणे असते. स्वावलंबनातूनच सबलता मिळते. छोटे मोठे उद्योग उभे केले पाहिजे, निर्णय घेता आले पाहिजे. यावेळी प्रा. शाहीन मुल्ला, आशा धनाले, प्रा सुजाता म्हेत्रे, सुनिता कांबळे, गीतांजली पाटील, आशा लोंढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुहासिनी शिंदे, सविता काकडे, नंदा खैरमोडे, अनुराधा ठोंबरे, सलिमा शेख, सुनिता पवार, शैलजा भिंगारदेवे, मंदाताई सोनताटे, भादुले मॅडम उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.