शेती कर्जाची 1377 कोटींची विक्रमी वसूली
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेती कर्जाची वसुली यंदा विक्रमी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत वसुलीत 9.30 टक्के वाढ झाली. 1377 कोटी 92 लाख 48 हजार रुपयांची वसुली झाली आहे. बॅँकेने थकबाकीदार शेतकर्यांसाठी शेतकरी वसुली प्रोत्साहन योजनेंतर्गत राबवलेल्या ओटीएस योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. 3090 शेतकर्यांनी योजनेचा लाभ घेतला. त्यांच्याकडील 75 कोटी रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली. त्यामुळे बॅँकेला मोठा दिलासा
मिळाला असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पीक कर्जासह मध्यम, दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाची 1755 कोटी 32 लाख 33 हजार रूपये थकबाकी होती. यापैकी 30 जून 2022 अखेर तब्बल 1377 कोटी 92 लाख 48 हजार रूपयांची वसुली करण्यात आली. बॅँकेच्या शेती कर्जाची तब्बल 78.50 टक्के विक्रमी वसुली झाली.
यामुळे बॅँकेच्यावतीने सर्व तालुका विभागीय अधिकारी, विशेष वसुली अधिकारी यांचा बँकेचे अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक आ. मोहनशेठ कदम, दिलीपतात्या पाटील, विशाल पाटील, राहूल महाडीक, महेंद्र लाड, वैभव शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ आदि उपस्थित होते. आ. नाईक पुढे म्हणाले. जिल्हा बॅँकेत नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर बॅँकेच्या शेती व बिगर शेती कर्जाचा एनपीए कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.