पंतप्रधानांचा दौरा, हॉटेलचं बिल 80 लाख रुपये :, पैसे न भरल्याने हॉटेल प्रशसनाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या वर्षी म्हैसूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य केलं होतं, त्या हॉटेलचं बिल अद्याप बाकी आहे. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण, वन तसेच हवामान बदल मंत्रालयाद्वारे प्रोजेक्ट टायगर उपक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसूरमध्ये उपस्थित होते. त्यांनी हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझामध्ये वास्तव्य केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ ते ११ एप्रिलपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी राज्याच्या वन विभागाला ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. केंद्राकडून शंभर टक्के निधी मिळण्याचं आश्वासन वन विभागाला मिळालेलं होतं. हा कार्यक्रम पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच एनडीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शॉर्ट नोटिशीच्या आधारावर आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचा एकूण खर्च ६.३३ कोटी रुपये इतका होता.
वास्तविक केंद्र सरकारकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्याचं वन विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाकडून मागणी होऊनही ३.३३ कोटी रुपयांचा शिल्लक निधी अजूनही मिळालेला नाही. कर्नाटकचे प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी २९ सप्टेंबर २०२३ रोजी उप महानिरीक्षक, एनटीसीए, नवी दिल्ली यांना पत्र लिहून निधीची आठवण करुन दिली. परंतु एनटीसीएने १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र पाठवून म्हैसूर रेडिसन ब्लू प्लाझा येथील पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च राज्य सरकारने द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यानंतर २२ मार्च २०२४ रोजी आणखी एक पत्र विद्यमान पीसीसीएफ सुभाष के. मालखेडे यांनी पाठवलं. या पत्रामध्ये मालखेडे यांनी एनटीसीए यांना उर्वरित रक्कम देण्याची आठवण करुन दिली. ज्यात रेडिसन ब्लू प्लाझा हॉटेलमध्ये पंतप्रधान वास्तव्याला होते, त्याच्याही बिलाचा उल्लेख होता. परंतु केंद्राकडून काहीच उत्तर आलेलं नाही.
त्यामुळेच आता रेडिसन ब्लू प्लाझाचे महाव्यवस्थापक यांनी २१ मे २०२४ रोजी उप वनसंरक्षक बसवराजू यांना पत्र लिहून वर्ष उलटलं तरी बिल न भरल्याची आठवण करुन दिली. सातत्याने बिलाची आठवण करुन देऊनही पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे वार्षिक १८ टक्के व्याजाने बिलाची रक्कम भरावी लागेल. १ जून २०२४ पर्यंत बिल भरलं नाही तर हॉटेल प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 'वन इंडिया'ने हे वृत्त दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.