Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पापड किंवा इतर पदार्थ तळल्या नंतर उरलेल्या तेलंच काय करावे? ICMR ने दिल्या महत्वाच्या टिप्स

पापड किंवा इतर पदार्थ तळल्या नंतर उरलेल्या तेलंच काय करावे? ICMR ने दिल्या महत्वाच्या टिप्स 


तुमच्यापैकी अनेक जण पापड, फेण्या तळल्यानंतर कढईत उरलेले तेल पूर्ण संपेपर्यंत वापरत राहतात. अनेकदा त्याच तेलात परत पापड तळले जातात. पण, असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वनस्पती तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल ‘वारंवार गरम करून वापरू नका, असे सांगितले आहे. आयसीएमआरने म्हटलेय की, वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने त्यात विषारी संयुगे तयार होतात; ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने, त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स वाढतात; ज्यामुळे जळजळ आणि विविध जुनाट आजार होऊ शकतात, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या सहकार्याने, विविध वयोगटांतील लोकांसाठी १७ नवीन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत; ज्यामुळे त्यांना चांगले अन्न निवडण्यास मदत होईल. भारतीयांना चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारचे कुपोषण रोखण्यासाठी आरोग्यदायी अन्ननिवडीकरिता शिफारशी प्रदान करणे हे मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे.

तेल वारंवार गरम केल्याने कर्करोग, हृदयविकाराचा धोका
ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्वयंपाकात एकदा वापरलेले वनस्पती तेल पुन्हा वापरण्याची ही पद्धत घरात आणि बाहेरही खाद्यपदार्थ बनविताना सामान्यत: उपयोगात आणली जाते. अहवालानुसार, वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने हानिकारक वा विषारी संयुगे तयार होतात. त्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो. उच्च तापमानात तेलातील काही फॅट्स ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक असतात; ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते तेव्हा ट्रान्स फॅट्सचे प्रमाण वाढते.
तेलाचा पुन्हा वापर करण्याबद्दल ICMR काय म्हणते?

आयसीएमआरने सांगितले की, तुम्ही हे तेल भाजी बनविण्यासाठी वापरू शकता. पण, साधारणपणे तेलात एखादा पदार्थ तळल्यानंतर त्या तेलाचा वापर पुन्हा तळण्यासाठी करू नका. अशा प्रकारे एखादा पदार्थ तळल्यानंतर उरलेले तेल एक किंवा दोन दिवसांत वापरून संपवून टाका.

तज्ज्ञांचे मत काय?
वनस्पती तेल वारंवार गरम केल्याने ट्रान्स फॅट्स आणि अॅक्रिलामाइडसारखी हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात; ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. त्याव्यतिरिक्त तेल पुन्हा गरम करणे आणि पुन्हा वापरल्याने हानिकारक मुक्त रॅडिकल्स आणि इतर विषारी पदार्थ जमा होऊ शकतात; ज्यामुळे जळजळ, हृदयरोग आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. हे धोके टाळण्यासाठी एकच तेल अनेक वेळा वापरणे टाळावे किंवा त्याऐवजी ॲव्होकॅडो किंवा करडई तेल यांसारख्या हाय स्मोक तेलाचा वापर करावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.