दिल्ली : मागच्या आठ दिवसांपासून केंद्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेलं एक विधान याला कारणीभूत ठरलं आहे. आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढल्या जातील, हे आम्ही बसून ठरवू, असं वक्त अमित शाह यांनी एका टीव्ही कार्यक्रमात १६ डिसेंबरला केलं होतं.
यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं जाईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण महाराष्ट्रात भाजपला चांगलं संख्याबळ मिळाल्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदे यांना साइडलाईन करत देवेंद्र फडणवीसांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे. ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती, त्याच एकनाथ शिंदे यांचं भाजपनं डिमोशन केलं आहे. महाराष्ट्रात झालेला हाच प्रयोग आगामी काळात बिहारमध्ये पाहायला मिळू शकतो, यामुळे एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय. नितीश कुमार एनडीतून बाहेर पडले तर केंद्रात राजकीय भूकंप होऊ शकतो, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकतं, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी नितीश कुमार पुन्हा कोलंटउडी मारू शकतात, अशाही चर्चा आहेत.
अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे नितीश कुमारांबाबत दोन दिवसांपूर्वी आलेली बातमी. २० डिसेंबरला नितीश कुमार यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याचं सांगण्यात आलं. यानंतर नितीश कुमारांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. एकीकडे अमित शाह यांचं आलेलं विधान, त्यानंतर अचानक नितीश कुमारांची बिघडलेली तब्येत आणि त्यांचं या सगळ्यावर असलेलं मौन पाहता, ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वी देखील नितीश कुमार यांनी अशाप्रकारे मौन साधत मोठंमोठे भूकंप घडवून आणले आहेत.
नितीश कुमारांच्या या हालचाली पाहता भाजपही सावध झालं आहे. दिल्लीत अचानक भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पडली आहे. तसेच 8 जानेवारीला अमित शहांचा बिहार दौऱ्यावर देखील जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या आठवडाभरात घडणाऱ्या या घडामोडी पाहता, केंद्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याला अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल केलेलं विधान देखील कारणीभूत ठरत आहे. बिहारमध्ये दलित वोटबँक लक्षात घेता, अमित शाह यांचं विधान नितीश कुमारांना डॅमेज करू शकतं, त्यामुळे नितीश कुमारांना बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनायचं असेल तर नितीश कुमार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू हा एनडीए सरकारमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. जेडीयूकडे एकूण १२ खासदार आहेत. ते बाहेर पडले तर एनडीएचं बहुमत कमी होईल, शिवाय एकनाथ शिंदे गटाकडेही ७ खासदार आहे. राज्यातील मुख्यमंत्रीपद गेल्याने तेही नाराज असल्याचं बोललं जातंय. अशात नितीश कुमारांनी मोठा निर्णय घेतला तर केंद्रात राजकीय भूकंप होऊन, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळू शकतं, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.