Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमिताभ बच्चन यांच्या जावयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा; व्यक्तीला जीव द्यायला भाग पाडलं, नेमकं प्रकरण काय?

अमिताभ बच्चन यांच्या जावयाविरोधात फसवणुकीचा गुन्हा; व्यक्तीला जीव द्यायला भाग पाडलं, नेमकं प्रकरण काय?



बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता नंदाचे पती निखिल नंदा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. निखिल नंदा यांच्यावर फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं, त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनंतर खटला दाखल करण्यात आला. निखिल नंदा यांच्यासोबतच 9 जणांविरोधात फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

'ईटीव्ही भारत'च्या वृत्तानुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंह यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेंद्र यांचा भाऊ जितेंद्र सिंह दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता.

 
निखिल नंदा आणि इतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल
सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळायचा. पण, कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर, जितेंद्र एकटाच एजन्सीचं काम सांभाळत होता. ज्ञानेंद्र यांनी आरोप केला की, निखिल नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (एरिया मॅनेजर), सुमित राघव (सेल्स मॅनेजर), दिनेश पंत (यूपी हेड), पंकज भास्कर (फायनान्स कलेक्शन ऑफिसर), अमित पंत (सेल्स मॅनेजर), नीरज मेहरा (सेल्स हेड) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या सर्वांनी विक्रीचं लक्ष्य पूर्ण न झाल्यास त्यांचा डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. असं म्हटलं जातंय की, जितेंद्र खूप तणावाखाली होता आणि त्यानं त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत त्याच्या समस्या शेअर केल्या होत्या. निखिल नंदा यांच्यामुळे केली आत्महत्या?

21 नोव्हेंबर 2024 रोजी, कंपनीचे काही अधिकारी त्याला पुन्हा भेटल्याचं वृत्त आहे, ज्यामुळे दबाव वाढला. दुसऱ्या दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी, जितेंद्रनं आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, न्यायालयानं हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर, आता सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्रच्या वडिलांनी निखिल नंदा यांच्याबाबत काय म्हटलं?

जितेंद्रचे वडील शिव सिंह म्हणाले की, त्यांना निखिल नंदा यांच्या संबंधांची माहिती नव्हती. परंतु त्यांनी त्यांच्या मुलाच्या दुःखद मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार धरलं. ते म्हणाला, "मला माहीत नाही तो कोण आहे. आम्हाला न्याय हवा आहे." दरम्यान, दातागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गौरव विष्णोई यांनी तपास सुरू असल्याची पुष्टी केली. निखिल नंदा केवळ अभिषेक बच्चनचा मेहुणे नाही. तर ते राज कपूरची मुलगी रितू नंदा यांचेही चिरंजीव आहेत. ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे त्यांचे मामा आहेत. तर करिश्मा कपूर, करीना कपूर खान आणि रणबीर कपूर ही मावस भावंड आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.