Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विजेसाठी कोयनेतून जादा 4 TMC पाणी वापरण्यास मान्यता; म्हैसाळ, टेंभू, ताकारी योजनेतून सिंचनास 22 TMC चा उपसा

विजेसाठी कोयनेतून जादा 4 TMC पाणी वापरण्यास मान्यता; म्हैसाळ, टेंभू, ताकारी योजनेतून सिंचनास 22 TMC चा उपसा
 

सांगली : मॉन्सूनपूर्व पावसाने आठ दिवस पाणी पाणी केल्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे अनेक पंप बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत २२ टीएमसी पाणी उपसा करण्यात आला असून तूर्त योजनेवरील ताण कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहते, यावर पुढील निर्णय घेतला आहे. सध्याच्या स्थितीत विद्युत निर्मितीसाठी कोयना धरणातून अतिरिक्त चार टीएमसी पाणी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोयना धरणाची  साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. धरणातून ४२ टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी राखीव ठेवला जातो. ६७.५ टीएमसी पाणीसाठी वीज निर्मितीसाठी वापरला जातो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने तब्बल ४३ टीएमसी इतका पाणीसाठी सिंचनासाठी वापरण्याची वेळ आली होती. यंदा परिस्थिती बरोबर उलटी आहे. एकतर पाऊस खूप जास्त लांबला. परिणामी, सिंचन योजना उशिरा सुरू करण्यात आल्या.

त्यामुळे आतापर्यंत म्हैसाळ योजनेसाठी ८ टीएमसी, टेंभू योजनेसाठी ९ टीएमसी आणि ताकारी योजनेसाठी ५ टीएमसी इतका पाणीसाठी उपसण्यात आला आहे. पैकी म्हैसाळ योजनेचा पाणी उपसा हा चांदोली धरणातून होतो. एकूण २२ टीएमसी इतकेच पाणी वापरले गेले आहे. कोयना धरणातील सिंचनासाठीचा साठा शिल्लक राहणार आहे. मध्यंतरी महाजनकोने कोयना धरणातून ६७.५ टीएमसी पाण्याशिवाय अतिरिक्त पाणी वीज निर्मितीसाठी द्यावे, अशी मागणी होती.

परंतू, पावसाची स्थिती, पाऊसकाळ लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्णय केला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता निर्णय झाला आहे. वीज निर्मितीसाठी अतिरिक्त चार टीएमसी इतके पाणी उपलब्ध करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महाजनकोने आतापर्यंत सुमारे ६५.८ टीएमसी इतके पाणी वापरले आहे. आता पाऊस सुरू झाल्यानंतर राज्यातील शेतीसाठीच्या विजेची मागणी कमी झाली आहे.

काही पंप बंद
मे महिन्याच्या मध्यावर मॉन्सूनपूर्वचा पाऊस सुरू झाला. सलग आठ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडतो आहे. त्यात मुसळधार, मध्यम पाऊसही झाला. शेतातून पाणी निघाले. विहिरी भरल्या. शिवारात पाणी साचले. त्यामुळे उसाला पाणी देण्याचा प्रश्नच उरला नाही. अन्य पिकांनाही पाणी उपसा कमी झाला. परिणामी टेंभू योजनेच्या एक व दोन क्रमांकाचे टप्पे बंद करण्यात आले. माण नदीत पाणी सोडणारी योजना सुरू आहे. म्हैसाळ योजनेचा जतला जाणारा कालवा वाहतो आहे. अन्य काही कालव्यांचे आवर्तन बंद करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.