मुंबई/नवी दिल्ली: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिंदेसेनेचे अने मंत्री, आमदार वादात अडकत चालले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरु झालेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून गेले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राज्य भाजपला मेसेज गेल्याची सुत्रांची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वबळ आजमावून २०२९ साठीची तयारी सुरु करेल, अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत सोबत लढू. बाकीच्या ठिकाणी युती करायची ते नंतर बघू, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. शिंदेसेनेला सांभाळून घेण्याच्या सूचना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदेसेना आणि भाजप युतीत लढण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठी मतदार शिवसेना उबाठा आणि मनसेच्या पाठीशी उभे राहतील, याची भीती भाजपला वाटते. ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फाटाफूट भाजपला नको आहे. महायुती सोबत लढल्यास उद्धवसेना मुंबईत ४० ते ४५ जागा मिळू शकतात. पण भाजप, शिंदेसेना स्वतंत्र लढल्यास मतविभाजनामुळे उद्धवसेना ६० ते ६५ पर्यंत पोहोचू शकते. उद्धवसेनेनं उभारी घेतल्यास भाजपला फटका बसेल. ते भाजपला नको आहे.
लोकसभा, विधानसभेची निवडणूक भाजपनं शिंदेसेनेसोबत युती करुन लढवली. विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आलं. त्यामुळे शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा मेसेज गेला. त्यातच आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईत त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्रपक्षांना वापरतो आणि गरज सरल्यावर दूर सारतो, असा संदेश जनतेत याचीही भीती भाजपला वाटते.मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढेल, असंही दिल्लीतील धुरिणांना वाटतं. मुंबईत भाजप मजबूत आहे. त्या तुलनेत शिंदेसेना कमजोर आहे. त्यामुळे भाजप अधिकाधिक जागा लढवू शकतो. शिंदेसेनेपेक्षा दुप्पट जागा लढण्याचा भाजपचा मानस आहे. १२० ते १४० लढवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. एकनाथ शिंदेंनी गेल्या काही महिन्यांत उद्धवसेनेचे निम्म्याहून अधिक नगरसेवक गळाला लावले आहेत. त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहेत.तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लान ऍक्टिव्ह केला आहे. दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिंदेसेनेनं गेल्याच आठवड्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली. मुंबईत दलित मतदारांचं प्रमाण मोठं आहे. या मतदारांवर लक्ष केंद्रित करुन रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवलेंची रिपाईं महायुतीचा भाग असताना शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे. शिंदे यांनी बांधलेलं वेगळं संधान पाहता त्यांनी पुढे दगाफटका झाल्यास स्वबळाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.