Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल? धक्कादायक घडामोडीची शक्यता

Breaking News! केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल?:, धक्कादायक घडामोडीची शक्यता
 

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीत काही घडामोडी होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली शक्यता प्रत्यक्षात उतरण्याचे संकेत दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पाठोपाठ भेट घेतल्यानंतर खरेच काही घडणार असल्याचे सूत्रांनी सांगणे सुरू केले आहे.
 
राजकीय क्षेेत्रात चर्चांना वेग आला. यात महत्त्वाचे म्हणजे, देशाचा कारभार सांभाळणार्‍या चार प्रमुख मंत्र्यांची खाती बदलली जाणार, असे बोलले जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीचा चेहरा ठरवणे हा या घडामोडींचा केंद्रबिंदू असल्याचे बोलले जात आहे. उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण? हे ठरवणे, भाजपमधील संघटनात्मक बदल, अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचीही चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यानंतरची चर्चा पार पडली असतानाच राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर का दिले नाही, याबद्दलही उत्सुकतापूर्ण कुजबुज सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील राष्ट्रपतींची भेट घेतली. एकाच दिवशी काही वेळाच्या अंतराने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही भेटींत चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये अमेरिकेने भारतावर लावलेले आयात शुल्क, केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदल, 'ऑपरेशन सिंदूर'नंतरची परिस्थिती याबद्दल चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रपती भवनाने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारात सुरू असलेल्या मतदारयादी सुधारणा आणि अधिवेशनात संसदेत होत असलेल्या घडामोडी, याबाबतही बैठक झाल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के प्रतिपूर्ती कर आकारण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ही भेट झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आयात शुल्काला उत्तर देण्यासाठी भारताची रणनीती कशी असेल, यासंदर्भातील माहिती पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात शुल्काची चांगलीच चर्चा आहे. यामुळे भारताला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी काय तयारी केली आहे, या सगळ्या उपाययोजनांबद्दलही पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना अवगत केल्याचेही समजते. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाची विधेयके सरकारद्वारे आणली जाऊ शकतात, त्याची माहिती देण्यासाठीदेखील पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असू शकते, असेही अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच संसदेत दोन्ही सभागृहांत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा झाली. या चर्चेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिल्याचे समजते. सोबतच मणिपूरमधील परिस्थितीबाबतही गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींना अवगत केल्याचे समजते. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून खूप कमी कामकाज होऊ शकले. विरोधकांनी पहिल्या दिवसापासून पहलगाम दहशतवादी हल्ला, 'ऑपरेशन सिंदूर' आणि बिहारमधील मतदार सुधारणा यादीवर चर्चेची मागणी केली. यापैकी 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा झाली असली, तरी विरोधक अजूनही बिहारमधील मतदार सुधारणा यादीवरील चर्चेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे हा विषयदेखील या भेटीमध्ये चर्चिला गेल्याचे समजते.

5 ऑगस्टचा यापूर्वीचा योगायोग!
केंद्र सरकारने आतापर्यंत 5 ऑगस्ट रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी केले होते. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील 5 ऑगस्ट रोजी घेतला होता. भाजपप्रणीत 'एनडीए' सरकारने आपले महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 5 ऑगस्टला केले. त्यामुळे येत्या 5 ऑगस्टला 'एनडीए' सरकार जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेणार का किंवा अन्य कुठला तरी महत्त्वाचा निर्णय घेणार, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.