लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी विरोधकांच्या इंडिया आघाडीची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. शिवाय, राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांना पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकांमध्ये कशाप्रकारे घोळ झाला आहे, हे देखील समजून सांगितले.
या बैठकीत २५ पक्षांचे सुमारे ५० नेते उपस्थित होते. या पक्षांमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, आरएलपी, सपा, आरजेडी, व्हीआयपी, सीपीआय, सीपीएम, सीपीएम, एफबी, जेएमएम, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, डीएमके, व्हीसीके, आरएसपी, आययूएमएल, केरळ काँग्रेस (एम), के काँग्रेस (जे), एमएनएम, एमडीएमके, केएमडीके, पीडब्ल्यूके यांचा समावेश आहे.या आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीत कशीप्रकारे हेराफेरी केली जात आहे, हे सांगितले होते. याच प्रमुख मुद्य्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत असाही निर्णय घेण्यात आला आहे की, महाआघाडी १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये मतदान हक्क यात्रा सुरू करेल. तसेच, ३० ऑगस्ट रोजी ही यात्रा पाटणा येथे संपेल, जिथे महाआघाडीची संयुक्त रॅली होईल. या यात्रेत तेजस्वी यादव आणि राहुल गांधी उपस्थित राहतील. तर याशिवाय राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीत असेही ठरविण्यात आले आहे की, ११ ऑगस्ट रोजी सर्व इंडिया आघाडीचे नेते संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढतील.याशिवाय या बैठकीत राहुल गांधींनी सर्व नेत्यांना निवडणुकीत कशाप्रकारे घोळ होत आहे हे सांगितले. या बैठकीला राजदचे तेजस्वी यादव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एमएनएमचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार कमल हासन हे देखील उपस्थित होते. याशिवाय, या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तिरुची शिवा, अभिषेक बॅनर्जी हे देखील हजर होते. या बैठकीबाबत राहुल गांधींनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देत कर्नाटक आणि महाराष्ट्राचा उल्लेख करून अनेक उदाहरणे दिली. त्यांनी असेही म्हटले की आज बिहारमध्ये जे घडत आहे ते देशात कुठेही घडू शकते. त्यामुळे हा एक गंभीर मुद्दा आहे, जो आपल्या देशाच्या लोकशाहीला आव्हान देत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.