सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याची मागणी सांगलीच्या पदाधीकऱ्यांकडून करण्यात आली आहे. आमदार नायकवडी यांचा २ वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आमदार नायकवडी यांना वरिष्ठ पातळीवरून राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आलं आहे.
मात्र, अल्पसंख्याक समाजाची भीती दाखवून, नायकवाडी राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहेत,असा आरोप राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक जमील बागवान यांनी केला आहे. तसेच इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत अनेक नाराज नेत्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले. तसेच अजित पवार हे देखील आमदार नायकवडी यांच्यावर नाराज होते. अजित पवारांनी यांच्या सोबत आपली 27 जानेवारी रोजी भेट झाली होती. त्यावेळी नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत अजित दादांनी आपल्याला सूचक इशारा दिला होता, असा गौप्यस्फोट देखील केला आहे.दरम्यान, नायकवडी यांच्याकडून पक्षविरोधी कारवाया झाल्याचेही पक्षाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे बागवान यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. आता पक्षश्रेष्ठी या वादावर काय निर्णय घेतात आणि नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.