पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांच्या चुलते बाळासाहेब फडणवीस यांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित 'देवाभाऊ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना, 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल,' असे वक्तव्य त्यांनी केले.
त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बाळासाहेब फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणापासूनच्या प्रवासाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, कायद्याचे शिक्षण घेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्णपदक मिळवले होते. त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्वगुण असल्याने ते राजकारणात मोठे स्थान मिळवतील, असा विश्वास त्यांना सुरुवातीपासूनच होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील एका नामांकित वकिलांकडे काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी जनसंघाच्या विचारसरणीशी स्वतःला जोडत सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि पुढे राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे बाळासाहेब फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाविषयीही भाष्य केले. घरात ते कधीही राजकारण करत नाहीत. कुटुंबीयांशी ते अत्यंत साधेपणाने आणि मोकळेपणाने वागतात. त्यांच्यातील हे गुणच भविष्यात त्यांना आणखी मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्यास सक्षम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘देवाभाऊ’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, बाळासाहेब फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाची विविध स्तरांवर चर्चा होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.