शरद पवार, उद्धव ठाकरें यांनीही भाजप सरकार मध्ये यावे! रामदास आठवले
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आता राज्यातील आघाडी सरकारची ताकद वाढली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत इंदुमीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम योग्य प्रकारे सुरू असल्याचे सांगितले. भारतीय दलित पँथरच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी श्री. आठवले यांच्यासह जुन्या पँथरच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने आठवले नाशिक दौऱ्यावर होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या दोन जागा, तर विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत मी स्वतः शिवसेनेच्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांच्या जागेवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहे, असेही ते म्हणाले. राज्यात प्रकाश आंबेडकर आणि माझा असे दोन मोठे गट एकत्र आले तरच रिपब्लिकन ऐक्याचा चेहरा पुढे येईल, असेही त्यांनी सांगितले.देशात समान नागरी कायदा असावा, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. त्यामुळे माझ्या रिपब्लिकन पक्षाचा समान नागरी कायद्याला पाठिंबा आहे. मात्र, या कायद्याविषयी मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे. याबाबत मुस्लिमांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. आठवले म्हणाले, की समान नागरी कायदा असावा, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. आज केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यादृष्टीने विचार करीत आहे. यात मुस्लिमांच्या मनात विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे. मात्र देशासाठी समान नागरी कायदा गरजेचा असल्याने माझ्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे, असे सांगत त्यांनी पूर्वीच्या दलित पँथरच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू असल्याचे सांगितले
अजित पवारांचा निर्णय योग्यच
पँथरची बांधणी नव्याने करायची झाल्यास त्याचे स्वरूप कसे असावे, भूमिका काय असावी, या सगळ्याचा सांगोपांग विचार सुरू आहे. केंद्रात भाजपसोबत ११ वर्षांपासून सत्तेत असून, केंद्रात एक मंत्रिपद मिळावे. भाजप सोबतच्या युतीत आधी एकनाथ शिंदेपाठोपाठ अजित पवार आल्यामुळे आमच्या महायुतीची ताकद वाढली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. पण अजित पवार यांचाच निर्णय योग्य आहे, असा दावाही त्यांनी केला. राज्य कार्यकारिणीचे श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.