'भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी नव्हते तर ते नरसिंहराव होते'; 'या' काँग्रेस नेत्याचं विधान
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी विधान केलं आहे. 'भाजपचे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी नव्हते तर ते नरसिंहराव होते'; असे त्यांनी म्हटले आहे.
राजधानी दिल्लीत 'मेमोयर्स ऑफ ए मॅव्हरिक - द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941 ते 1991)' या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी हे भाष्य केले. मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला आहे. अटल बिहारी वाजपेयी नाहीतर राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, असे त्यांनी म्हटले आहे. अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांपासून ते डिसेंबर 1978 ते जानेवारी 1982 या कालावधीत कराचीतील कौन्सुल जनरल म्हणून त्यांच्या कार्यकाळापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना बाबरी मशीद प्रकरणावर राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी 'मला वाटतं की पायाभरणी चुकीची होती', असे म्हटले.
दरम्यान, सोनिया गांधींचे कौतुक करत राजीव गांधी यांच्या निधनानंतर राजकारणात येण्यामागे सोनिया गांधींचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. राजीव गांधी गेल्यानंतर अनेकांना वाटले की या माणसाला संपवू. पण मी फक्त त्यांच्या (सोनिया गांधी) मुळेच पक्षात टिकलो. सोनिया गांधींनी मला कॅबिनेट मंत्री केले. मात्र, तत्कालीन पंतप्रधानांना मला राज्यमंत्री बनवायचे होते, असेही म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
